संयुक्तराष्ट्रे – गेल्या सुमारे 19-20 वर्षात म्हणजेच सन 2000 ते 2019 या कालावधीत मलेरिया प्रसारावर भारताने मोठे नियंत्रण मिळवले असल्याची माहिती संयुक्तराष्ट्राच्या एका अहवालात देण्यात आली आहे.
सन 2000 साली भारतात मलेरिया रूग्णांची संख्या सुमारे 20 दशलक्ष इतकी होती. ती सन 2019 पर्यंत 5.6 दशलक्ष इतकी खाली आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्यावतीने जागतिक मलेरिया स्थितीचा अहवाल काल प्रकाशित करण्यात आला त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
सन 2019 या वर्षात संपुर्ण जगातील मलेरिया रूग्णांची संख्या 22 कोटी 90 लाख इतकी होती. याच वर्षात मलेरियामुळे मरण पावलेल्यांची जगातील एकूण संख्या 4 लाख 9 हजार इतकी होती.
मलेरिया नियंत्रणात दक्षिण आणि पुर्व आशियातील देशांनी चांगली कामगीरी केली आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दक्षिण अशियातील मलेरियामुळे मरण पावलेल्यांचे प्रमाण 73 टक्क्यांनी तर पुर्व अशियातील देशांमध्ये मलेरियामुळे मरण पावलेल्यांची संख्या 74 टक्क्यांनी घटली आहे.
संपुर्ण जगातील एकूण मलेरिया रूग्णांपैकी 3 टक्के रूग्ण दक्षिण आणि पुर्व अशियातील देशांमध्ये आढळून आले आहेत. या अहवालात भारताने मलेरिया निर्मुलनाच्या कार्यात केलेल्या चांगल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भारतात मलेरिया रूग्णांचे प्रमाण गेल्या दोन वर्षात 18 टक्क्यांनी आणि मृत्युचे प्रमाण 20 टक्क्यांनी घटले आहे असे यात नमूद करण्यात आले आहे.