मुंबई – “आजच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे, याची जाणीव नक्कीच होईल. संपूर्ण राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपाला दिलेल्या समर्थनाबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद करतो.” असं ट्विट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी राज्यात आज (१ डिसेंबर) मतदान सुरू आहे. यंदा महाविकास आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष प्रथमच एकत्रितरीत्या निवडणूक लढवत असल्याने भाजपच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
याबाबत पाटील यांनी ही निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी ठरेल असा दावा करताना “आजची निवडणूक ही महाविकास आघाडीला एक मोठा हादरा देईल. लोकशाहीमध्ये जनतेकडे मतदान हेच एकमेव असे प्रभावी शस्त्र आहे, जो सरकारला त्यांच्या अपयशी कारभाराची जाणीव करून देतो. ”
“या निवडणुकीच्या माध्यमातून लोक आघाडी सरकारला किती कंटाळले आहेत हे समजेल. यासोबतच सरकारमध्ये नसूनही ज्या प्रकारचे समर्थन पदवीधर आणि शिक्षकांनी आमच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण राज्यात केले, ते फारच उत्साहवर्धक होते. या निवडणुकीमुळे सरकारच्या बहुमताला काही फरक पडणार नाही, मात्र पुढे तरी सरकार जनहितार्थ कार्य करण्याचा विचार तरी करेल, अशी इच्छा व्यक्त करतो.” असं ट्विट केलं आहे.
आजच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे, याची जाणीव नक्कीच होईल. संपूर्ण राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपाला दिलेल्या समर्थनाबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद करतो. pic.twitter.com/l4AiDnZW0X
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 1, 2020