मुंबई – नोएडातील प्रस्तावित फिल्मसिटी संदर्भात चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत येणार आहेत. उद्या ते जाणकारांशी चर्चा करणार आहेत. मात्र, मुंबईची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात हलवण्याचा त्यांचा कट असल्याचे बोलले जात आहे. त्यावर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘बॉलिवूड किंवा इतर उद्योगामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्माण होतो, त्यामुळे तो कुठेही नेण्याचं काही कारण नाही. एखाद्या वेळेस योगी आदित्यनाथ जी अशाच प्रकारचा उद्योग हा आपल्या राज्यामध्ये सुरु करावा हा अभ्यास करण्यासाठी येत असतील, मात्र मुंबईतून बॉलिवूड ते तिथे नेऊ शकत नाहीत.’ असे चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे.
मुंबईतील बाॅलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथ आज मुंबईत येणार असून आज आणि उद्या ते बाॅलिवूड कलाकारांसह निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत.
‘उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योजक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी,’ असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.