ब्रुस ऑक्सेनफोर्ड या पंचाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज ललित यादव याला ज्या पद्धतीने धावबाद दिले ते पाहता सुमार पंचगिरीचा फटका या स्पर्धेतही विविध संघांना व पर्यायाने खेळाडूंना बसणार आहे.
तसे पाहिले तर करोना काळात परदेशी पंच भारतात येऊ शकत नव्हते किंवा अन्य देशांतही जाऊ शकत नव्हते त्यामुळे स्थानिक पंचांनाच आयपीएलसह विविध मालिकांमध्ये पंच म्हणून कार्यरत राहावे लागले. मात्र, आता करोनाचा धोका संपला असून परदेशातील पंचही यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दाखल झाले आहेत. मात्र, याच प्रसिद्ध पंचांचा दर्जा इतका घसरलेला दिसत आहे की, याबाबत आता बीसीसीआयने आयसीसीच्या सहकार्याने पंच गुणवत्ता सुधार समिती वगैरे स्थान केली पाहिजे. गुजरातविरुद्धच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज ललित यादव याला ज्या पद्धतीने धावबाद दिले गेले ते पाहून पंच झोपा काढतात की काय असे वाटले.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने कॉल दिल्यावर यादवने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला व क्रिझपर्यंत जाण्यासाठी धाव घेतली. त्याचवेळी विजय शंकर या क्षेत्ररक्षकाचा पाय आधी स्टम्पला लागला व बेल्स पडल्या. त्यानंतर त्याने चेंडू स्टम्पला लावताना बेल्स पाडली.
मैदानावरील पंचांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली असेल पण टीव्ही पंच कशी काय चूक करु शकतो. त्याच्यासमोर तर प्रत्येक घटनेचे चित्रीकरण पाहण्याची सोय असूनही टीव्ही पंच ब्रुस ऑक्सेनफोर्ड यांनी ही चूक कशी काय केली.
यंदाच्या स्पर्धेत अनंत पद्मनाभन व उल्हास गंधे हे मैदानावरील पंच होते. त्यांनीही रिप्ले पाहत असलेल्या ऑक्सेनफोर्ड यांच्याशी संवाद का साधला नाही. या स्पर्धेत नितिन मेनन व अनील चौधरी हे भारतीय पंचही काम करत आहेत. याच दोन्ही पंचांवर गेल्या दोन ते तीन मोसमांपासून सातत्याने टीका होत आहे. खरेतर मेनन यांचे सुरुवातीला कौतुक झाले होते. मात्र, त्यांच्याकडूनही अविश्वसनीय चुका झाल्या आहेत.
वेस्ट इंडीजचे माजी आंतरराष्ट्रीय पंच स्टीव्ह बकनर हे सुरुवातीच्या काळात जसे सर्वात चांगले पंच म्हणून नावारुपाला आले व नंतर त्यांनीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अन्य काही फलंदाजांना अनेकदा बाद नसतानाही बाद दिले गेल्याचे व आपल्या हातून चुका झाल्याचे जाहीरपणे मान्य केले होते. आता यंदाच्या स्पर्धेतही चुका घडत आहेत. खेळाडूंनाच नव्हे तर संघांनाही त्याचा फटका बसत आहे. उर्वरीत स्पर्धेत या चुका दूर करण्यासाठी बीसीसीआयसह हे पंचही प्रयत्न करतात का हेच महत्त्वाचे आहे.