पुणे – करोनाचे सर्व निर्बंध महाराष्ट्र सरकारने काढून टाकल्यामुळे आयपीएल स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी उत्सूक असलेल्या प्रेक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यातच घेण्यात आलेल्या निर्णयामुळे उद्यापासून (6 एप्रिल) मैदानाच्या आसनक्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
यंदाच्या मोसमातील साखळी सामने महाराष्ट्रात सुरु आहेत. यापूर्वी करोनाचे निर्बंध असल्यामुळे आसन क्षमतेच्या 25 टक्केच तिकिटांची विक्री झाली होती.
दरम्यान, सरकारने 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली असली तरीही मैदानावर उपस्थित राहताना मात्र, प्रेक्षकांना मास्क वापरावाच लागणार आहे. करोनाचे निर्बंध मागे घेतले गेले असले तरीही पुढील काही दिवस गर्दीच्या ठीकाणी मास्कचा वापर करावाच लागणार आहे.