यंदाच्या मोसमात आयपीएल क्रिकेट स्पर्धेची क्रेझ राहिलेली नसल्याचे वारंवार बोलले जात होते. तरीही स्पर्धा पुढे-पुढे सरकली तशी ती चर्चेचा विषय बनली. त्याचे कारण गुजरात. प्रथमच स्पर्धेत सहभागी झालेल्या एका संघाच्या नावात गुजरात. त्या संघाने विजयी घोडदौड सुरू ठेवत गाठलेली फायनल. फायनलचे ठिकाण गुजरातमधलेच नरेंद्र मोदी स्टेडियम. तेथील अंतिम लढत जिंकत गुजरात टायटन्सने पदार्पणातच विजेतेपद खिशात घातले. गुजरातबाबतचे ते सगळे योगायोग जुळून आल्याने प्रामुख्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली…
यावेळच्या आयपीएल स्पर्धेच्या प्रारंभी गुजरात संघाचा फारसा बोलबाला नव्हता. एक तर तो संघ नवखा होता. तो संघ प्रथमदर्शनी मजबूत वाटावा असाही नव्हता. एवढेच नव्हे तर, संघाचे नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या फारसा भरात नव्हता. आधीच्या तगड्या मुंबई संघातून त्याला बाहेर पडावे लागले होते. त्याशिवाय, भारतीय संघातील त्याचे पुनरागमनही अवघड मानले जात होते. मात्र, आयपीएल स्पर्धेत गुजरातने विजयाचा धडाका लावला अन् नवा विजेता बनण्याचा मानही मिळवला.
गुजरात संघाची आगेकूच सुरू झाली तशी तो संघच जिंकेल, असा दावा छातीठोकपणे क्रिकेटशौकिनांनी सुरू केला. त्या दाव्यासाठी संघाच्या नावाकडे लक्ष वेधले जाऊ लागले. संघाच्या नावात असणारे गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य. मोदी-शहांचा गुजरात आयपीएमध्ये हरणार नाही अशी खूणगाठ क्रिकेटशौकिनांनी मनोमन बांधली. त्यातून ते अंतिम सामना फिक्स असल्याचा नेहमीचा संशय वर्तवू लागले. तसे मत जाहीरपणे अंतिम सामना सुरू असतानाच सोशल मीडियावरून अनेकांनी मांडले.
अंतिम सामन्याला अमित शहा उपस्थित राहिले. ती उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. शहांचा फोटो गेम चेंजर असे कॅप्शन देत अनेकांनी सोशल मीडियावरून फिरवला. प्रथम फलंदाजी करणारा राजस्थान रॉयल्स संघ स्वस्तात गुंडाळला गेला. त्यामुळे गुजरातचा विजय जवळपास निश्चित झाला अन् सोशल मीडियावरील संशयकल्लोळ पुन्हा वाढला. अनेकांनी पुन्हा फिक्सिंगचा मुद्दा पुढे केला. काहींनी
गुलाल आपलाच असे कॅप्शनही शहांच्या फोटोला दिले. अपेक्षेप्रमाणे कमी धावांचा पाठलाग करणे गुजरातला जड गेले नाही अन् तो संघ पहिल्याच प्रयत्नात चॅम्पियन बनला. आता आयपीएलचा अंतिम सामना फिक्स असल्याच्या चर्चा काही दिवस सुरू राहतील. पण, त्या चर्चेत गुजरात संघाच्या प्रभावी कामगिरीकडे दुर्लक्ष होऊ नये इतकेच.
हार्दिकच्या टीमने सांघिक कामगिरी उंचावल्याचे नाकारून चालणार नाही. स्वत: हार्दिकने आयपीएल स्पर्धेत फिनिक्स भरारी घेतली. त्याने नेतृत्वकौशल्य दाखवत, अष्टपैलुत्व सिद्ध करत भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवले. आयपीएलमुळे अनेक गुणवान खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत असल्याचे सातत्याने समोर आले. ती स्पर्धा क्रिकेटशौकिनांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे. त्यामुळे पूर्वग्रह मनात ठेऊन स्पर्धेच्या निकालांविषयी शंका घेणे योग्य ठरणार नाही. खरेतर, खेळात राजकारण आणले जाऊ नये असे म्हणतात. पण, क्रीडा क्षेत्रातील राजकारण्यांच्या वाढत्या वावरामुळे बहुधा स्पर्धांकडेही राजकीय भिंगातून पाहिले जाऊ लागले आहे. त्या मिक्सिंगमुळेही कदाचित फिक्सिंगच्या चर्चा होतच राहतील!