– विनायक जोशी
भारतात पुढील काळात ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येला सक्षमपणे आरोग्य सुविधा पुरवणे हे सगळ्यात मोठे आव्हान असणार.
आज जगात सगळ्यात जास्त तरुणांची संख्या भारतात आहे. भारताची लोकसंख्याही जगात सगळ्यात जास्त आहे. थोडक्यात, भारताकडे जेवढे मनुष्यबळ आज आहे, तेवढे ते अन्य कोणत्याही देशाकडे नाही. जवळपास दीडशे कोटींच्या घरात आपण पोहोचलो आहोत. ही जशी जमेची बाजू आहे तशीच जबाबदारीची जाणीव करून देणारीही आहे. या लोकसंख्येमुळे भविष्यात आपल्याला ज्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, त्याचा गांभीर्याने विचार होतो आहे का, हा खरा प्रश्न आणि जर होत नसेल तर त्या दिशेने काय आणि कधी करणार आहोत, हा दुसरा प्रश्न.
संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेचा अहवाल गेल्या पंधरवड्यात जाहीर झाला. त्यात काही आकडेवारी नेहमीप्रमाणे देण्यात आली. भारतात आज ज्येष्ठ नागरिकांची संख्या साधारण 15 कोटी आहे. हा आकडा 2022 मधील आहे. शिवाय ज्येष्ठ म्हणजे ज्यांनी साठी ओलांडली आहे त्यांची ही संख्या आहे. पुढील 27 वर्षांत ही संख्या दुपटीपेक्षा जास्त म्हणजे 35 कोटींच्या घरात पोहोचेल. दीडशे कोटींच्या देशात एवढे सगळेच लोक श्रमशक्तीतून बाद होणार नाहीत. मात्र वयाच्या साठीनंतर त्यांची कार्यक्षमता निश्चितच कमी झालेली असते व त्यामुळे त्यांचा अगदीच नगण्य नाही तर किमान हातभार अर्थकारणाला आणि अन्य बाबींना लागत असतो.
वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत संशोधनामुळे मानवाचे सरासरी आयुर्मान वाढले आहे. सरसकट सगळेच शंभरी पार करत नसले तरी वयाची सत्तरी अथवा ऐंशी गाठणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि हे चांगले लक्षण आहे. मात्र, बदलते जीवनमान आणि हवामान, कामाचा ताण आणि धावपळ हे शरीराकडून टॅक्स वसूल करत असतात अन् हा टॅक्स दुखण्यांच्या स्वरूपात भरावा लागतो. पूर्वी साठी ओलांडल्यानंतर होणारे रक्तदाब, मधुमेह आदी आजार आज चाळीशीतच गाठत आहेत. अगदी तिशीतील युवकांनाही त्यांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा या समस्या भेडसावू लागतात तेव्हा वैद्यकीय उपचारांची नितांत गरज असते.
नमूद केलेले हे दोन आजार केवळ जीवनशैलीशी संबंधित विकार आहेत. यापेक्षाही कैकपटीने अधिक इतर दुखणी आपल्याला गाठत असतात आणि करोनासारखी महामारी क्षणभरात सगळे ठप्पही करून जाते. एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात तेवढ्याच सक्षमपणे आरोग्य सुविधा पुरवणे हेच सगळ्यात मोठे आव्हान. केवळ आरोग्यच नव्हे, तर शिक्षण, निवारा, सामाजिक सुरक्षितता याही प्रमुख बाबी आहेतच. कामकऱ्यांचा वर्ग म्हणजे जे रोजगार अथवा व्यवसायात अथवा उत्पादनाच्या प्रक्रियेत सक्रिय आहे हा साधारणपणे 20 ते 59 या वयोगटातील मानला जातो. संबंधित अहवालातील आकडेवारीनुसार भारतात या वर्गाची संख्या 51 टक्क्यांच्या आसपास आहे. जी येत्या काळात कमी होत जाणार आहे आणि त्यावेळी आपण प्रत्यक्ष आव्हानाच्या मध्यभागी असणार आहोत.
देशातील लोकसंख्येची रचना बदलण्यास पुढच्या दशकात सुरुवात होईल. किंबहुना ती आताच झाली आहे, तथापि, तिचे दृश्य परिणाम आपल्याला पुढच्या काळात दिसू लागतील. अर्थव्यवस्था आणि एकूणच समाजव्यवस्थेच्या अनुषंगाने ते दिसतील. आरोग्याचा विषय आताच आपल्या आवाक्याबाहेर आहे. करोनाच्या काळात अन्य प्रगत देशांपेक्षा भारताने चांगली कामगिरी केली असे आकडेवारी सांगते. आपण लस तयार केली आणि जगातील सगळ्यात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवला हे अभिमानाने सांगतो. मात्र, करोना हा एक अपवाद. ते जगाच्या मानवजातीच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे संकट होते. एरव्ही आपल्या आरोग्य व्यवस्थेची काय अवस्था आहे ते सातत्याने समोर येत असते. प्रगत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या शहरांमध्ये गेल्याच महिन्यात धक्कादायक घटना घडल्या आहे.
अत्यंत तोकड्या सुविधा, यथातथा मनुष्यबळ, औषधांचा तुटवडा आणि क्षमतेपेक्षा तिप्पट ते चारपट रुग्णांची संख्या. याचा परिपाक रुग्णांना अत्यंत हलाखीच्या स्थितीत जगाचा निरोप घ्यावा लागला. सरकारी रुग्णालयांची मरणासन्न अवस्था आणि कामाच्या प्रचंड बोजामुळे तेथील कर्मचाऱ्यांना आलेली मरगळ आणि उदासीनता एकीकडे, तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांचे पिळवटून टाकणारे उपचार. रुग्णाला जगण्यापेक्षा मरणे स्वस्त वाटू लागावे एवढा खर्च अशा विचित्र कात्रीत आपण सध्या आहोत. पैशाचे सोंग आणता येत नाही आणि रुग्णासोबत बसून राहण्याची चैन परवडत नाही ही शोकांतिका.
आपल्याकडे पूर्वी एकत्र कुटुंबे होती. गरजेमुळे किंवा अपरिहार्यतेमुळे कुटुंबेही विभक्त झाली आहेत. त्यामुळे लहान मुलांचा प्रश्न आहे तसाच ज्येष्ठांचाही प्रश्न आहे. जे गरीब आहेत ते गरिबीतच राहतात, त्यांच्या उपचारांचा खर्च परवडत नाही आणि जे संपन्न आहेत त्यांच्याकडे खासगी रुग्णालयांतील खर्च करण्याची ऐपत असली तरी त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी मनुष्यबळ नाही अशी विचित्र स्थिती आहे. ही आजची स्थिती असून त्यात दिलासा मिळण्याची शक्यता नसून दिवसेंदिवस ती बिकटच होत जाणार आहे. साठीनंतर म्हणजे निवृत्तीचे आयुष्य जगत असताना आपला जीवनसाथी बरोबर असला तर त्यातल्या त्यात अडचणी आणि आजारांचे दुखणे सुसह्य होते. एकाकी आयुष्य जगणाऱ्यांच्या समस्या त्यापेक्षा अनेक पटीने वेगळ्या आणि गंभीर आहेत.
प्रगत देशांना याचा सामना करावा लागला आहे. त्यामुळेच जपानसारख्या देशांत ज्येष्ठांना रुग्णालयांत दाखल होण्यास कष्ट पडू नयेत आणि त्यांना फार शारीरिक श्रम न पडता दाखल होता येईल अशा सुविधा असलेली रुग्णालयेच नव्हे तर शहरे वसवण्याच्या संकल्पनेने आता मूर्तरूप घेतले आहे. भारत येत्या तीन दशकांत तरी हा पल्ला गाठू शकतो का, असा प्रश्न विचारल्यास आजच्या सुविधा आणि स्थिती बघितली तर हे अशक्य वाटते. देशात राजकीय आणि सामाजिक घुसळण सुरू आहे. सगळेच आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. त्यांना लढवलेही जात आहे आणि त्यातून राजकीय हेतू साधला जातो आहे. मात्र आपल्या आरोग्य सुविधा आणि वय वाढत चाललेल्या ज्येष्ठांच्या सुविधांकडे आणि गंभीर होत चाललेल्या या आव्हानाकडे ते लक्ष केव्हा देणार?