लढाई…! मैदानावरची, घरातली, बाहेरची-आतली… स्त्री-पुरुष कोणालाच चुकलेली नाही. प्रत्येकजण आपापल्यापरीने लढतच असतो… कुणी परिस्थितीबरोबर तर कोणी स्वतःबरोबर… लढाई अविरत चालूच राहते… इतिहासातील एक रणांगणावरची लढाई झाली, जिथे राणी लक्ष्मीबाई नावाच्या शूर मातेने स्वतःच्या तान्हुल्याला पाठीशी बांधून शत्रूशी निकराची झुंज दिली… वर्तमानातील एक लढाईही अशीच होती, जिथे रंजना भोसले या एका हतबल मातेने पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या तान्हुल्यांना पाठीशी बांधून हॉटेलमध्ये काम केले… इतिहासाने त्या मातेला अजरामर केले, तर वर्तमानातील या मातेला मात्र तिच्या अपरिमित कष्टांचे फळ मिळाले. परिस्थितीमुळे हातगाड्यावर हॉटेल चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या रंजना भोसले आज दोन उद्योजकांच्या माता म्हणून ओळखल्या जातात…
रंजना भगवान भोसले यांचा जन्म 1 जानेवारी 1969 साली परभणी जिल्ह्यात झाला. सातत्याने पडणारा दुष्काळ आणि घरची हालाखीची परिस्थिती यामुळे त्यांच्या वडिलांनी कामाधंद्यासाठी पुणे गाठले. यावेळी रंजना या अवघ्या 3 वर्षांच्या होत्या. पुण्यात आल्यावर त्यांचे वडील हे थेरगाव येथेच स्थायिक झाले ते कायमचेच. रंजना यांना लहानपणी शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, घरची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने त्यांना ते घेता आले नाही. त्यांचा विवाह भोसरी येथील भगवान भोसले यांच्याशी झाला. विवाहानंतर तरी दिवस पालटतील, असे त्यांना वाटले होते. मात्र, त्याउलट त्यांच्यावर अधिकच जबाबदारी आली. सासरची थोडीफार जागा होती ती पण गेली. भाड्याचे घर, त्यात दोन मुलांचा जन्म… घर कसे चालवायचे, मुलांचे शिक्षण कसे करायचे? या विचाराच्या गर्तेत रंजनाताई अडकल्या, त्यांनी यावेळी हिंमत न हारता स्वतः हातगाड्यावर हॉटेल सुरू केले. यातून काही पैसे मिळवल्यावर भोसरी एमआयडीसी परिसरात हातगाडीवर एक लहानसे हॉटेल सुरू केले.
दरम्यान, लहान मुलांचा सांभाळ कसा करायचा हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न पडला. मुलांना सांभाळायचे की, हॉटेल चालवायचे? अशा द्विधा मनस्थितीत त्या अडकल्या. दोनही गोष्टी महत्त्वाच्या असल्याने त्यांनी शेवटी पर्याय शोधला. झाशीची राणी जर बाळाला पाठीशी बांधून लढू शकते, तर आपण का नाही काम करू शकणार? या विचाराने त्यांनी आपल्या लहान मुलांना पाठीला बांधून हॉटेलची सर्व कामे सुरू केली. या कामात त्यांच्या पतीचे थोडेफार योगदान होते. मात्र, ते नावापुरतेच, त्या काळात पतीनेही रंजनाताईंची सत्वपरीक्षाच पाहायचे जणू ठरवले होते. काही कारणास्तव काही दिवसांसाठी रंजना या हॉटेलवर कामावर नव्हत्या. दरम्यान त्यांचे हॉटेल पतीने परस्पर विकले. त्यावेळी रंजनाताईंवर मोठेच संकट कोसळले. आता सर्वच संपले असा विचार त्यांच्या मनात आला. मात्र, जादा पैसे मोजून त्यांनी आपले हॉटेल परत मिळवले. पुढे काही वर्षांनी परिस्थिती बदलली. हॉटेल व्यवसाय वृद्धींगत झाला. तेव्हा पतीसाठी त्यांनी एक टेम्पो विकत घेतला व ट्रान्सपोर्ट व्यवसायाला सुरुवात केली. रंजनाताईंचा हॉटेल व्यवसाय हा तब्बल 25 वर्षे सुरू राहिला. यादरम्यान त्यांची दोन मुले व एक मुलगी शाळेत जावू लागले. त्यावेळी सुट्टीच्या वेळेत मुलांची मदत घेऊन रंजना यांनी हॉटेल काम सुरू ठेवले.
आपल्याला खरेतर खूप शिकायचे होते, असे रंजनाताईंनी सांगितले. त्या म्हणाल्या, “मला शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा परिस्थितीमुळे घेता आले नाही. मात्र, माझ्या मुलांवर तशी वेळ येऊ नये यासाठी रात्रंदिवस मी कष्ट करत होते. दरम्यान काही पैसे जमवत मुलांना भोसरीत एक रबर बनवण्याची मशिन विकत घेतली आणि त्यांना रोजगार मिळवून दिला. मुलांनी लहानपणापासून माझा संघर्ष बघितल्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी ओळखली आणि ते ही जोमाने काम करू लागले.’ अल्पावधीतच रंजनाताईंच्या मुलांनी चिकाटीने रबर मशिनच्या साह्याने ह्या उद्योगाचे मोठ्या कंपनीत रूपांतर केले. आणि येथूनच त्यांची उद्योगपती बनण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. हळूहळू कंपनीच्या शाखा वाढत गेल्या, सद्य घडीला एक मोठी कंपनी म्हणून त्यांची कंपनी नावारूपाला आली आहे. ही कंपनी रंजनाताईंचा मोठा मुलगा सचिन भोसले सांभाळत आहे. तर, लहान मुलगा नितीन भोसले यांनी कष्टाने बांधकाम व्यवसायात जम बसवत पिंपरी-चिंचवड शहरातील अव्वल बांधकाम व्यावसायिकांच्या शृखंलेत आपले स्थान निर्माण केले आहे.
मागील आयुष्यातील संघर्षाचे दिवस आठवताना रंजनाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. “मी संघर्ष केला, कष्ट केले, त्याचे फळ मला आज मिळाले आहे. मुलांवर चांगले संस्कार केल्यावर त्यांना आपल्या कष्टांची जाणीव होतेच, यावर माझा विश्वास आहे. जिद्दीने कुठली गोष्ट ठरवल्यास यशापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळे दृढ इछाशक्तीने कार्य करायला हवे. उर्वरित आयुष्यात जमेल तशी गोरगरिबांना मदत करायची इच्छा आहे. माझ्या मुलांना लहानपणी खेळवता आलेच नाही. आता मला चार नातू आहेत. त्यांना खेळवत असते.’