भुईंज – सातारा-पुणे महामार्गावरील आनेवाडी टोल नाका अधून मधून नेहमीच चर्चेत राहिला आहे. सद्यस्थितीत टोल नाक्यावर होणारी “तीन पानी, काला पिला ‘ नावाचा जुगार, भर दिवसा टोल नाक्यावर नाचणाऱ्या तलवारीचा थयथयाट, टोल नाक्यावर होणारी भाईगिरी, कर्मचाऱ्यांची प्रवाशांना उद्धट वागणूक अशा विविध कारणांमुळे टोलनाक्यावर टोल प्रशासनाचे लक्ष आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
आनेवाडी टोलनाका हा नेहमीच वादग्रस्त राहिलेला असून आताही या ठिकाणी मनमानी कारभार सुरू आहे. या टोलनाक्यावर स्वच्छतागृहासह इतर सुविधांचा अभाव आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात टोल आकारणी करणाऱ्या कंपन्या प्रवाशांना स्वच्छतागृह सुद्धा उपलब्ध करून देत नाहीत. त्या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आहे. याचा गैरफायदा अपराधींना होऊ शकतो. परंतु याकडे टोल प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. रोज लाखो रुपयांची टोल वसुली करणाऱ्या टोल प्रशासनाला प्रवाशांना सोयी सुविधा देण्यासाठी वेळ नाही या ठिकाणी मोठा अपघात झाल्यास रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नाही अशा एक ना अनेक समस्यांकडे टोल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
काही समस्या असल्यास फोन केल्यानंतर टोल व्यवस्थापक फोन उचलत नाहीत. टोल नाक्यावरील कामगार प्रवाशांना दमदाटीची भाषा करतात. सरकारने टोल वसुलीला धडाकेबाज सुरू केली मात्र, र टोल भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांस मूलभूत सुविधा मिळाव्यात इतकी मापक अपेक्षा असते. उच्च दर्जाचे रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची सुविधा, रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा, टोयींगची सुविधा पुरवण्याची जबाबदारी टोल व्यवस्थापनावर असते. परंतु या टोल नाक्यावर सुविधांचा अभाव दिसून येत आहे. पूर्वी आनेवाडी टोल नाक्यावर स्थानिकांना टोल वसुलीसाठी रोजगार उपलब्ध होत होता. परंतु सद्यस्थितीत स्थानिकांना डावलले जात आहे.
स्थानिकांच्या वाहनांना टोलची सवलत मिळत होती ती सुद्धा आता मिळत नसल्याने स्थानिक वाहन चालकांमधून संताप व्यक्त होत आहे. गेले कित्येक दिवसांपासून टोल नाक्यावर स्थानिकांना व प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल माफी दिली जात नाही. कित्येक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून प्रवासी वाहतूक करण्यासाठी वाहने विकत घेतली आहेत. अशा स्थानिक प्रवासी वाहनांवर टोल आकारणी होत असल्याने संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. स्थानिक प्रवासी वाहनधारकांना टोल सवलत न मिळाल्यास टोल नाक्यावर संघर्षाचा भडका उडाल्यास आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कर्मचारी आंदोलनाच्या पवित्रात
या टोल नाक्यावर कित्येक तरुण व तरुणी कामाला आहेत. परंतु ऐण दिवाळीच्या तोंडावर गेल्या दोन महिन्यांपासून येथील कर्मचाऱ्यांना पगार दिला नसल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे टोल प्रशासना विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा उद्रेक आंदोलनाच्या माध्यमातून होणार आहे.
टोलनाक्यावरील गुंडगिरीला आळा घाला
आजमितीला आनेवाडी टोल नाका गुंडांचा अड्डा बनला असून लाखो रुपयांच्या वाहनांचे मालक असलेल्या वाहनधारकांना टोल नाक्यावरील कर्मचारी अपमानास्पद वागणूक देतात. अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान प्रवाशांकडून अनेक सामाजिक संघटना कडून टोल नाक्यावरील अशा प्रकारच्या गुंडगिरीला सरकारने आळा घालावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.