हॉलीवूडमधील किलबिलने इतिहास घडवला आहे. तिकडच्या चित्रपटांत नायिकांनी अनेक ऍक्शन पटांत काम केले आहे. मुळात तेथे ड्रामा आणि नाचगाणे अगदी दुर्मिळ असते.
ऍडव्हेन्चर, थ्रीलर, साय फाय, ऍक्शन अशी त्यांच्या चित्रपटांची जातकुळी असते. कथा अगदी वेगवान असते आणि चित्रपटांत प्रचंड ऍक्शनही असते.
बऱ्याच नायिकांनी अशा चित्रपटांत काम केले आहे. मात्र, खऱ्या अर्थाने आपला ठसा उमटवला तो किलबिलच्या उमा थर्मनने.
आता त्याचे भारतीय संस्करण मोठ्या पडद्यावर आणले जाण्याची जुळवाजुळव सुरू आहे. अनुराग कश्यप हा चित्रपट करतो आहे व त्यात कृती सेननची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली आहे. या बातमीला दुजोराही मिळाला आहे. अन्य तपशील इतक्यात उघड करण्यात आलेला नाही.
कृतीचे एकूण व्यक्तिमत्त्व म्हणजे उंची आणि चेहरेपट्टी पहाता ती या भूमिकेसाठी परफेक्ट आहे असे म्हणता येऊ शकेल. शिवाय तिने स्वत: ऍक्शन केली नसली तरी टायगरसोबत काम करून तिने या प्रांतात बऱ्यापैकी अनुभव घेतला आहे.
अनुराग कश्यपचे काही दुर्गुण सोडले तर तो याबाबतच्या कथेला योग्य न्याय देऊ शकतो असे वाटते. दरम्यान, ही बातमी पसरल्यानंतर काही विरोधाचे सूरही कानी येत आहेत. काहींच्या मते आपण अजुन किती काळ अशा बाहेरच्या कथांवर चित्रपट करणार?
आपल्याच देशात सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत व त्या सांगितल्या गेलेल्या नाहीत. त्याकडे निर्माते दिग्दर्शक कधी लक्ष देणार असा सवाल काहींनी विचारला आहे.