कोल्हापूर – मागील जवळपास 15 दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरु आहे. यादरम्यान शासनाने अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. आशातच कोल्हापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. शासन कामावरून काढून टाकणार या दबावाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल मारुती कांबळे (वय-38) असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
कांबळे हे 2015 साली एसटी सेवेत सावंतवाडी आगारात भरती झाले होते. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मडीलगे खुर्द गावात त्यांचे निधन झाले. एसटी संपाचा तिढा सरकार सोडवत नसल्याने कांबळे यांना ताण आला आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या व एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी 27 ऑक्टोबर रोजी एसटी कामगारांचं आंदोलन सुरू झालं. 28 ऑक्टोबर रोजी वाढीव महागाई भता मान्य करत काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं उपोषण मागं घेतलं. मात्र, 29 ऑक्टोबरपासून कामगारांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला. संघर्ष एसटी युनियन आणि कनिष्ठ वेतन श्रेणी या संघटनांनी संपाचं नेतृत्व स्वीकारलं. त्यानंतर हा संप दिवसेंदिवस चिघळत आहे. सध्या राज्यातील 250 आगारांतील सेवा ठप्प आहे.
उच्च न्यायालयाचा मनाई आदेशही कामगारांनी धुडकावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्य परिवहन मंडळानं परोपरीनं विनवणी करूनही कामगार माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळं मोठाच पेच उभा राहिला आहे. राज्य सरकारनं खासगी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्यानं कामावर येण्याची इच्छा असलेल्या कामगारांना संरक्षण पुरवण्याच्या सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलीस महासंलकांकडं दिल्या होत्या. तसेच संपामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.