नवी दिल्ली -त्रिपुरामध्ये धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आल्याची बातमी पूर्ण खोटी आहे. त्याविषयी सोशल मीडियावर फिरणारी बातमी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शनिवारी देण्यात आले.
त्रिपुरामधील कथित घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रातील काही शहरांत हिंसाचार घडला. त्याची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. त्रिपुरातील कुठल्याही घटनेत कुणी जखमी होण्याचे, मृत्युमुखी पडण्याचे किंवा बलात्काराचे वृत्त नाही.
त्यामुळे खोट्या बातमीवरून स्वत:ची दिशाभूल होऊ न देता जनतेने शांतता बाळगावी. महाराष्ट्रातील हिंसाचाराच्या घटना चिंताजनक आहेत.
शांतता आणि सलोखा बिघडवण्याच्या उद्देशातून अयोग्य वक्तव्ये केली जाऊ नयेत, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले.