कोल्हापूर – कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठावरील गो शाळेत शिळे अन्न खायला घातल्याने सुमारे ५२ गायींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान आणखी काही गायींची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. गेल्या चार दिवसापासून पर्यावरण संरक्षणासाठी मठावर सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे.
या दरम्यान ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पशुसंवर्धन विभागाने या बातमीला दुजोरा दिला असून श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
अशातच याच वृत्ताचं वृत्तांकन करण्यासाठी मठात गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना अडवत कणेरी मठावरील स्वयंसेवकांनी मारहाण केली. चित्रीकरण करू नये, तसेच बातमी देऊ नये, यासाठी माध्यम प्रतिनिधींना मारहाण करण्यात आली. मारहाण झालेल्या माध्यम प्रतिनिधीचे नाव भूषण पाटील असं आहे. या घटनेचा कोल्हापूरसह राज्यभरात तीव्र निषेध केला जातोय. घडलेल्या प्रकारची त्वरित चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी करत ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भूषण पाटील यांच्यासह इतर माध्यम प्रतिनिधीही होते त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार कणेरी मठ परिसरात झाला. याप्रकरणी कोल्हापूर प्रेस क्लबसह पत्रकार संघटनेकडून निषेध व्यक्त केला गेला. तसंच गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, कणेरी मठावर मागच्या २० फेब्रुवारी पासून सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे. यामध्ये विविध कार्यक्रम होत असून दररोज हजारो भाविक ,पर्यटक मठावर येत आहे. त्यांना मठातर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान मठावरील गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने सुमारे गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान मृत गाईंचे पंचनामे करून त्यांचं पोस्टमार्टम करून अंतिम अहवाल दोन दिवसात दाखल होईल अशी माहिती कोल्हापूर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त वाय.ए. पठाण यांनी दिली आहे.