लंडन – ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला यांना क्वीनचा दर्जा दिला जाणार आहे. पुढील वर्षी जेव्हा शाही दाम्पत्याचा राज्याभिषेक संपन्न होणार आहे तेव्हा क्वीन कॅमिला जो राजमुकुट परिधान करणार आहेत त्यामध्ये प्रसिद्ध कोहिनूर हिरा मात्र असणार नाही. कोहिनूर हिऱ्याच्या मालकीचा दावा सांगणाऱ्या भारताच्या नाराजीची भीती शाही राजघराण्याला सतावत असल्यानेच राज्याभिषेक समारंभात कोहिनूरचा समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील वर्षी 6 मे 2023 रोजी किंग चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी क्वीन कॅमिला यांचा राज्याभिषेक संपन्न होणार आहे. यावेळी परंपरेप्रमाणे क्वीन कॅमिला यांना राजमुकुट परिधान केला जाणार आहे. आत्तापर्यंत सर्वच क्वीननी आपल्या राजमुकुटामध्ये कोहिनूर हिरा परिधान केला होता पण या वेळी प्रथमच ब्रिटिश राजघराण्याने कोहिनूर हिरा मुकुटात न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोहिनूर हिऱ्या मालकीबाबत भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या सर्वांनी आत्तापर्यंत दावे केले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर नव्या राणीने आपल्या राजमुकुटमध्ये हा हिरा परिधान केला तर त्यामुळे विनाकारण नाराजीचे वातावरण निर्माण होईल आणि भारतासारख्या मोठ्या देशाला नाराज करणे ब्रिटनला सध्या परवडणारे नसल्याने ब्रिटिश राजघराण्याने यावेळी मुकुटामध्ये कोहिनूर न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे दांपत्य जेव्हा राज्याभिषेक समारंभ पूर्ण करेल तेव्हा त्यामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी किंवा वाद-विवाद असू नये अशी राजघराण्याची भूमिका असल्याने कोहिनूर हिऱ्याला या समारंभा पासून बाजूला ठेवण्यात येणार आहे परंपरेप्रमाणे शाही राजघराण्यातील महिलांनाच म्हणजेच राणी आणि राजकन्या यांनाच कोहिनूर हिरा असलेला राजमुकुट परिधान करण्यात येत असे शाही राजघराण्यातील पुरुष मात्र कोहिनूरशी संबंधित काही शापीत घटनांच्या अफवांमुळे कोहिनूरचा समावेश असलेला राजमुकुट परिधान करत नाहीत.
आतापर्यंत क्वीनला जो राजमुकुट परिधान करण्यात येत होता त्यामध्ये अत्यंत मौल्यवान असे छोटे-छोटे 2800 हिरे आहेत त्या समवेत 105 कॅरेटचा कोहिनूर हिरा सुद्धा लावला जात असे भारतातील शेवटचे शिख सम्राट दलीप सिंह यांनी हा कोहिनूर हिरा तत्कालीन ब्रिटिश सम्राज्ञीला भेट दिला होता. तेव्हापासून तो ब्रिटिश राजघराण्याच्या ताब्यात आहे पण कोहिनूर याबाबत आतापर्यंत अनेक वाद असल्यानेच नव्या शाही दांपत्याने या वादापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे