नवी दिल्ली -ब्रिटनच्या संसदेत भारतातील कृषी कायदे आणि त्याविरोधातील शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा झाली. त्याविषयी तीव्र नापसंती दर्शवत भारताने मंगळवारी ब्रिटीश उच्चायुक्तांना पाचारण केले.
दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये सहभागी झालेल्या आंदोलक आणि पत्रकारांविरोधात बळाचा वापर होत असल्याच्या मुद्द्यावर सोमवारी ब्रिटनच्या संसदेत चर्चा झाली.
याबाबत गंभीर दखल घेऊन परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी ब्रिटीश उच्चायुक्तांना पाचारण केले. भारतातील कृषी सुधारणांबाबत ब्रिटनच्या संसदेत झालेली चर्चा अनावश्यक स्वरूपाची होती. ती चर्चा म्हणजे लोकशाही असणाऱ्या इतर देशाच्या राजकारणातील हस्तक्षेप आहे. वास्तवाचा विपर्यास करून मतपेढीचे राजकारण करण्याचे ब्रिटीश खासदारांनी टाळावे, अशी भारताची भूमिका श्रृंगला यांनी मांडली. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयानेही ब्रिटनच्या संसदेतील एकांगी चर्चेबद्दल नाराजी व्यक्त केली. याआधीही कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाबाबत भूमिका मांडणाऱ्या इतर देशांना आणि त्यांच्या नेत्यांना भारताने स्पष्ट शब्दांत सुनावले होते.