- शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना आयकार्ड पाहूनच दिले जाणार तिकीट ?
- प्रवासादरम्यान अनेक नियमाचे करावे लागणार पालन
खालापूर – करोना संकट वाढू नये यासाठी रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्या सेवेला आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सध्या राज्यातील करोना आजाराची स्थिती स्थिर झाली असल्याने महाराष्ट्र शासनाने अनेक उद्योग व्यवसायात हळूहळू सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारपेठा, खासगी प्रवास, एसटी बस सेवा, मालवाहतूक यानंतर आता रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
खोपोली येथून सोमवारी (दि. 2) पहाटे पहिली रेल्वे मुंबईच्या दिशेने धावली. रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिलेला नाही. मात्र या सेवेत सर्वसामान्य ग्राहकांना ठराविक काळातच प्रवास करता येणार असून, अन्य वेळी शासकीय सेवेचे आयकार्ड दाखविल्याशिवाय तिकीटच दिले जाणार नाही. तिकीट न काढता प्रवास करताना कोणी सापडला, तर त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
खोपोली हे मुंबईपासून खोपोलीपर्यंतच्या रेल्वे सेवेतील शेवटचे टोक म्हणावे लागेल. खोपोली शहरातून मुंबईपर्यंत दैनंदिन कामासाठी किंवा नोकरी धंद्या निमित्ताने दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये व्यापारीवर्गाचा मोठा सहभाग असे, मात्र करोनाच्या संकटामुळे बंद करण्यात आलेल्या रेल्वे सेवेचा व्यापार आणि उद्योगावर विपरीत परिणाम झाला होता.
तसेच मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्या कामगारांची मोठी अडचण निर्माण झाली होती. महाराष्ट्र शासनाने रेल्वे बोर्डाला केलेल्या विनंतीवरून सुरू करण्यात आलेल्या रेल्वे सेवेचा 2 नोव्हेंबर रोजी खोपोली शहरातील रेल्वे प्रवाशांनी फायदा घेतला.
सोमवारी पहाटेच सुरू झालेली रेल्वे सेवा ही महत्वाच्या तसेच शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. दुपारी एक फेरी ही सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. सध्यातरी रेल्वेचे प्रवासी तिकीट देताना शासकीय सेवेतील आयकार्ड असलेल्या व्यक्तीलाच तिकीट दिले जात असल्याचे समजत आहे. ही रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी खोपोली येथील नियमित प्रवासी असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळेच ही सेवा सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे.