खेड शिवापूर,(वार्ताहर) – पुणे-सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी ते सारोळा या दरम्यान खेड शिवापूर, हरिश्चंद्री या ठिकाणी अनेक दिवसांपासून रखडलेला उड्डाणपूल मान्यता मिळूनही बांधला गेला नाही, त्यामुळे शिवभूमी विद्यालयातील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच महामार्ग ओलांडावा लागत आहे. जर येथे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून खेड शिवापूर येथे उड्डाणपूल बांधण्यासाठी मागणी केली जात होती, त्याला संबधित शासनाने काही महिन्यांपूर्वी मान्यता देण्यात आली असून त्याचा मुहूर्त कधी होणार याकडे शिवभूमी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिवभूमी विद्यालयात शेकडो विद्यार्थी हे नसरापूर, वर्वे, शिवरे या भागातून येत असतात. त्यांना माघारी जाण्यासाठी पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर बंगला रस्ता ओलांडावा लागतो; मात्र उड्डाणपूल नसल्याने दोन्ही बाजूने भरधाव येणार्या वाहनांचा त्यांना सामना करून रस्ता ओलांडावा लागत आहे.
याप्रसंगी कधी मोठी दुर्घटना घडू शकते हे नाकारता येत नाही. म्हणून खेड शिवापूर व हरिश्चंद्री येथे लवकरात लवकर उड्डाणपूल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत रिलायन्स इफ्राचे जनरल मॅनेजर राकेश कोळी यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
मला अनेकदा शिवगंगा खोर्यातील नागरिकांनी या समस्येबद्दल सांगितले होते. हजारो विद्यार्थी हा रस्ता ओलांडतात ही एक गंभीर बाब आहे. त्याचप्रमाणे सभोवताली अनेक मोठे उद्योग थाटले असून त्याठिकाणी वाहन जाण्यासाठी समस्या येत आहेत हे लक्षात घेऊन मी वारंवार उड्डाणपूल व्हावा याचा पाठपुरावा केला असून येत्या दोन-तीन दिवसांत उड्डाणपुलाचे काम सुरू केले जाणार आहे. – रमेश कोंडे, संचालक, पीएमआरडीए तथा जिल्हाप्रमुख शिवसेना