नवी दिल्ली – राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना जे भाषण केले त्यातील मोठा भाग अध्यक्ष जगदीप धनखड यांनी काढून टाकला आहे. त्याविरोधात त्यांनी आज सभागृहात तक्रार केली आणि हा वगळलेला भाग पुन्हा रेकॉर्डवर घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. खर्गे यांच्या मागणीवर काही सदस्यांची समिती नियुक्त केली जाईल आणि नंतर त्यावर निर्णय घेतला जाईल असे धनखड यांनी यावेळी सांगितले.
राज्यसभेच्या नियम आणि कार्यपद्धतीतील नियम २३८ अ आणि नियम २३८ (५) चा हवाला देत खर्गे म्हणाले, माझ्या भाषणात मी मांडलेले काही मुद्दे रेकॉर्डमधून काढले गेले आहेत. मी माझ्या वक्तव्यात कोणाचेही नाव घेतले नाही. ते काढून टाकण्यात आले आहे.
माझ्या वक्तव्यामुळे प्रक्रियेच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही. आपल्या भाषणाची दोन पाने सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्याचा आरोप खर्गे यांनी केला. आपले भाषण रेकॉर्डवर असे अर्धवट पद्धतीने देण्यात आल्याने आपल्या विषयी गैरसमज निर्माण होऊ शकतो असेही खर्गे यांनी निदर्शनाला आणून दिले.