नवी दिल्ली – उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची कथित प्रतिकात्मक संसदेत मिमिक्री करून हेटाळणी करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच चिघळण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे पालम ३६० चे प्रमुख सुरेंद्र चौधरी यांनी तृणमूल कॉंग्रेसला इशारा दिला आहे. या पक्षाच्या खासदारांनी आजच माफी मागावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. जर तृणमूलच्या खासदारांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या घरांना घेराव घातला जाईल असा इशाराही चौधरी यांनी दिला आहे.
आम्ही खाप पंचायत नाही तर बैठक बोलावली आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी लवकरात लवकर उपराष्ट्रपतींची, देशवासियांची आणि कोट्यवधी शेतकऱ्यांची माफी मागावी आणि आपल्या चुकीची दिलगिरी व्यक्त करावी. त्यांना जर त्यांच्या चुकीची जाणीव झाली नाही तर आम्ही पंचायत बोलवू आणि लवकरात लवकर त्यांच्या घरांना घेराव घालण्याचा निर्णयही घेतला जाईल, असे वृत्तसंस्थेशी बोलताना चौधरी यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांकडून आम्हाला अशा वर्तणुकीची अपेक्षा नव्हती आणि हा प्रकार दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. शेतकरी कुटुंबाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. लोकसभेतूनही सदस्यांना निलंबित केले गेले. तथापि, कोणाचा अपमान केला गेला नाही. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अवमान केवळ याच कारणासाठी केला गेला की ते शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.
राष्ट्रपतीही झाल्या व्यथित
ज्या प्रकारे उपराष्ट्रपतींचा अवमान करण्यात आला ते पाहून आपण अत्यंत व्यथित झालो आहोत असे उपराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपले विचार आणि भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र ते सभ्यपणे आणि मर्यादेच्या बंधनात असले पाहिजे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपराष्ट्रपतींशी चर्चा केली. काही सदस्यांनी उपराष्ट्रपतींचा अवमान केल्याबद्दल, त्यांची थट्टा केल्याबद्दल आणि अशोभनीय असे वर्तन केल्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला आहे.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही उपराष्ट्रपतींची भेट घेतली आणि झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. हा अत्यंत स्तब्ध करणारा प्रकार आहे. तसेच एका संसद सदस्याने तर या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ चित्रण करण्याचा निंदनीय प्रकार करत त्या कृतीला प्रोत्साहनच दिले आहे. दर्जा खालावण्याची नवी हद्द आहे आणि लोकशाहीवर आस्था असणारी कोणीही व्यक्ती असल्या कृत्यांचे समर्थन करणार नाही असे बिर्ला यांनी म्हटले आहे.