खंडाळा, {मोहित देवधर} – खंडाळा पोलीस ठाण्याला दुय्यम अधिकारी नसल्याने खंडाळा पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचे चित्र सध्या खंडाळ्यात दिसून येत आहे. येथे तातडीने दुय्यम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
यामध्ये तथ्यही आहे, वास्तविक पाहता खंडाळा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकूण 27 गावे समाविष्ट आहेत. खंडाळा हे तालुकास्तरीय शहर त्यात राष्ट्रीय महामार्ग व एमआयडीसीची जोड असल्याने या ठिकाणी छोटे-मोठे गुन्हे मिळून वार्षिक जवळपास 200-250 गुन्हे दाखल होत असतात. यातच यावर्षी सर्वत्र असलेल्या निवडणुका अशा परिस्थितीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या बैठका, बंदोबस्त, राजकीय नेत्यांचे दौरे, सण-उत्सव, मोर्चे, आंदोलने हे सर्वही पहावे लागत आहे.
अशा वेळी कर्तव्यानिमित्त अधिकारी जर बाहेर गेले तर दैनंदिन गुन्हे दाखल होताना बऱ्याच अडचणी निर्माण होतात, एखादा गंभीर गुन्हा घडल्यास त्याक्षणी त्वरित निर्णय घेण्यासाठी दुय्यम अधिकाऱ्याची गरज कर्मचाऱ्यांना भासते.
अशावेळी दुय्यम अधिकारी खंडाळा पोलीस ठाण्यात असले तर गंभीर परिस्थितीतही त्वरित निर्णय घेताना कर्मचाऱ्यांनाही अडचण निर्माण होणार नाही, एवढेच नव्हे तर अशा बऱ्याच अडचणी दूर होतील. तपासालाही वेग मिळेल व प्रभारी अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताणही येणार नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या बाबीचा विचार करावा व खंडाळा पोलीस ठाण्याला दुय्यम कारभारी मिळावा, हीच अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
निवडणुकांच्या काळात अनेक गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता कधीच नाकारता येत नाही, अशावेळी प्रभारी अधिकारी कर्तव्य बजावताना परगावी असले अन अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ? असे काही घडल्यानंतर दुय्यम अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याआधीच आत्ता गरज असताना नियुक्ती झाली तर निश्चितच हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.
प्रभारी अधिकाऱ्यांच्या कामाने समाधान
गेल्या अनेक दिवसांपासून खंडाळा पोलीस ठाण्याला चोरांचे ग्रहण लागले होते. गुन्ह्यांचा तपासही लागत नव्हता मात्र खंडाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून पो.नि. सुनील शेळके यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणल्याने सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
परंतु या राजाला जर वजीराची साथ मिळाली तर तपासाला गती मिळेल व येणारा काळ नक्कीच गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरेल परंतु यावर वरिष्ठ काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.