खालापूर – आडातच नाही तर पोहऱ्यात कुठुन येणार? अशी परिस्थिती सध्या खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने खालापूर तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. प्रशासनाकडून पाणी टंचाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी हे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसत आहे. सध्या खालापूरमध्ये पाच ते सहा गावात टॅंकरने पाणी पुरवठा केला जातो. आणखी दहा गावांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर 15 हुन अधिक गावांमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी इतर उपाययोजना करण्यात येणार आहेत.
मे महिन्यातच उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. उन्हामुळे विहीरी कोरड्या पडल्या असून धरणांचा पाणीसाठाही कमी झाला आहे,त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा खालापूर तालुक्यालाही बसू लागल्या आहेत. अनेक वाड्यात सद्यस्थितीत टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई असल्याने टॅंकरने पाणी पुरवठा करावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सध्या या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे.
खालापूर तालुक्यातील परखंदे, शिरवली, डोणवत, ठाकुरवाडी, वावोशी, बौद्धवाडा, दांडवाडी, गोहे बीडखुर्द, नडोदे, खरीवली, नारंगी, देवकुंड, शिरवली, ढेबेवाडी, चिंचवली-गोहे, बोरगाव, तारवाडी, वरोसे, आंबेवाडी या ठिकाणी पाणी टंचाई असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबविण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. या गावांमध्ये विहिरी व पाणी साठवणूक टाक्या पूर्णत्वास आल्या आहेत. तर काही प्रकल्प प्रस्तावित आहेत. दीर्घ कालीन उपाय झाल्यावर या ठिकाणी असलेला पाणी टंचाईचा प्रश्न निकालात निघेल असा विश्वास प्रशासनाला आहे. खालापूर तालुक्यात तीन मोठी धरणे, अनेक पाझर तलाव व तालुक्यातून बारा महिने वाहणारी पाताळगंगा नदी असतानाही खालापूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे दुर्देवी चित्र सध्या पहायला मिळत आहे.
मोर्बे, कलोते, डोणवत या धरणांबरोबरच आत्करगाव, नढाळ यांच्यासह अनेक पाझर तलावही तालुक्यात आहेत. असे असताना अनेक गावे व वाड्यांवर पिण्याचे पाणी नसल्याने महिलांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते. शासनाच्या पाणी योजना सर्वच ठिकाणी राबविण्यात आल्या असल्या तरी अर्ध्याहुन अधिक योजना स्थानिक राजकारणामुळे पुर्ण झाल्याच नाहीत. पाताळगंगा नदीच्या पाण्यावर अनेक गावांच्या योजना पुर्ण होवू शकतात. मात्र प्रशासनाची उदासीनता यामुळे खालापूर तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.