सातारा – वाळूउपसा व विक्री हा व्यवसाय संबंधित घटकांशी लागेबांधे ठेवत चालविला जातो. या संबंधांमध्ये बिघाड झाला की, व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यांवर आणि प्रशासनातील घटकांवर जीवघेणे हल्ले होतात. नियम जेवढे कडक करण्यात आले, तेवढे गैरप्रकार वाढत गेले. मात्र, नदीपात्रातील वाळूवर रात्रीच्या अंधारात दरोडे घालणाऱ्यांना खाकीचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा वडूज व म्हसवड परिसरात आहे. हे कमी म्हणून की काय, खादी अन् खाकीचा मेळ बसून चोर शिरजोर होत आहेत. परिणामी माणच्या पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बांधकामांसाठी नद्यांमधील वाळू उपसून पुरविली जाते. हा व्यवसाय माण तालुक्यातही जोरात चालतो. त्यात अनेक वर्षांपासून गैरप्रकारही सुरू आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी नियम कडक करण्यात आले. मात्र, त्याचा परिणाम उलटा झालेला दिसतो. या नियमांमधूनही पळवाटा शोधण्यात आल्या असून गैरप्रकार आणखी वाढले आहेत. या व्यवसायाशी संबंधित घटकांची एक साखळीच तयार झाली आहे. त्यात अडथळा आला की, जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत वाळूमाफियांची मजल जाते.
माण तालुक्यात महिला तहसीलदारांवर हल्ला झाल्यानंतर या गैरप्रकारांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, माणमधील हा प्रकार एकमेव नाही. राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत वाळू व्यवसायात कमी-अधिक प्रमाणात गैरप्रकार होतात. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात. कोतवाल, तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना धक्काबुक्की, त्यांच्या अंगावर वाहने घालणे व जीवघेणे हल्ले होत आहेत. त्यातून बोध घेऊन या वाळूमाफियांविरुद्ध कडक पावले उचलण्याऐवजी म्हसवड व वडूज पोलिसांनी त्यांच्याशीच संधान सांधल्याची चर्चा आहे.
यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा हस्तक्षेप वाढत असल्याने कारवाईत अडथळे येत असल्याचे काही पोलीस खासगीत सांगत आहेत.गेल्या आठवड्यात शनिवारी (दि. 11) रात्री वाळूने भरलेला डंपर दहिवडीकडून कराडकडे निघाला होता. रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांनी तो अडवला; पण उपअधीक्षकांच्या “लाडक्या’ने तातडीने हस्तक्षेप करून कारवाईतील हवा काढून घेतल्याची चर्चा पोलीस दलात आहे. त्यानंतर रात्री 2.20 वाजता तोच डंपर एका चेकपोस्टवर गाडे नावाच्या कर्मचाऱ्याने अडवला.
त्यावेळी त्याने उपअधीक्षकांच्या आरटीपीसीच्या फोनवर ही घटना कळवल्यावर तातडीने कारवाई करण्याचा आदेश आला. मात्र, हा डंपर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणेपर्यंत सकाळचे पावणेसहा वाजले होते. तेथे डंपरमध्ये वाळू नसून ग्रिट असल्याचा साक्षात्कार महोदयांना झाला. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेल्यावर ती वाळू आहे की ग्रिट याबाबत अहवाल मागवल्याचे सांगण्यात आले. त्या दिवशी केवळ संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा संबंधितांवर दाखल करून पोलिसांनी सोपस्कार पार पाडले. त्यामुळे ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून त्यात कोण कोण महाभाग सहभागी होते, याची चर्चा रंगली आहे.
चौकशीच्या आदेशामुळे गुपित फुटणार?
हे प्रकरण घडल्यानंतर वडूजचे पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. उपनिरीक्षकाला चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले असून दीड पानांची प्रश्नावली त्याला पाठविण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान मोबाइल कॉल्सची डिटेल्स तपासण्याचा आदेश पाटील यांनी दिल्याने या प्रकरणाचे गौडबंगाल उघड होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
स्टेशन डायरी काय सांगते?
वडूज पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीत या कारवाईचा तपशील नोंद आहे. रात्री 2.28 वाजता वाळूची गाडी पकडल्याची, 2.38 वाजता कारवाईसाठी पोलीस ठाण्यातून जादा कर्मचारी पाठवल्याची आणि 5.59 वाजता त्या गाडीत वाळू नसून ग्रिट असल्याची नोंद आहे, अशी खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे 2.28 पासून चार तासांत काय घडले, कोण कोण त्या ठिकाणी गेले, कोणी कोणाला फोन केले, याचा शोध घेतल्यास “वाळूची ग्रिट कशी झाली’ याचे वास्तव समोर येईल.