महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही, अशा शब्दांमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. आपल्या वाढदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
एकनाथ खडसे यांनी यावेळी, “निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत आहे. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं होतं. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हतेसुद्धा. हे अलीकडे १०-१२ वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत.” अशी निनावी टीका केली.
“मी गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही,” असंही खडसे यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचं संकट संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचंही खडसे यांनी सांगितलं.