जयंत जाधव
सिंहगडरस्ता – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला खडकवासला मतदारसंघ सध्या भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाला हा भाग जोडलेला आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार या भागांमध्ये आहे तर मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे या मतदारसंघांमध्ये उभे केले आहे. परंतु, सध्याच्या राजकीय “गटबाजी’मुळे या मतदार संघात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.
धायरी, हिंगणे, सनसिटी नांदेड सिटी या भागांमध्ये भाजप, आरएसएसला मानणारा मतदार असला तरी राष्ट्रवादीचे आपले वर्चस्व या भागात टिकवून ठेवले होते. परंतु, गटबाजीमुळे आता पदाधिकारी, कार्यकर्ते यासह मतांचीही फुटाफुट होणार आहे. सध्याच्या राजकीय “गटबाजी’मुळे दोन्ही शरद पवार आणि अजित पवार असे गट राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडल्याने या मतदार संघातून नाराजी व्यक्त आहे. हा राजकीय बदल स्विकरण्यास कार्यकर्त्यांसह मतदारही सहजासहजी तयार नसल्याचीच स्थिती आहे.
राज्य सरकारकडे पुरेसे संख्याबळ असताना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करीत असताना लोकसभा 24 निवडणूक जवळ आली म्हणून राष्ट्रवादीचा एक गट फोडण्याचे राजकारण भाजपकडून करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी म्हणत आहेत. कॉंग्रेस मुक्त भारत, हा पंतप्रधान मोदी यांचा नारा आहे, याचा कारणातून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही टार्गेट केले असल्याची चर्चा खडकवासला मतदार संघात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कट्टर असलेल्या मतदारांनीही याबाबत भाजपचीच ही राजकीय खेळी असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार हे मोठे झाले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करता आली असती. सध्या, राजकीय वातावरण महाविकास आघाडीला पोषक झाले होते. परंतु, अजित पवार भाजपच्या खेळीला बळी पडले. यातून पक्षाचे मोठे नुकसान झाले असल्याची राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची भावना आहे.
याच कारणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वामध्ये सध्या गोंधळाचे वातावरण असून अनेकांनी वेट आणि वॉचची भूमिका घेतली आहे. खडकवासलामध्ये सर्वात जास्त अस्वस्थता शिवसेनेतून शिंदे गटामध्ये दिसून येत आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे भविष्य अंधारात असल्याची चर्चा सुरू आहे. सध्या, राहुल गांधी यांनी देशांमध्ये सकारात्मक वलय तयार केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्याच्या गटबाजीच्या राजकारणाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसलाच होईल, अशी अपेक्षा या पक्षाचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत