नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता या महानगराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्ष घालायचे ठरवले आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ज्या पद्धतीची पाणीपुरवठा यंत्रणा असते तशा स्वरूपाची पाणीपुरवठा यंत्रणा दिल्लीत साकारली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
पुढील पाच वर्षात दिल्लीत चोवीस तास पाणी पुरवले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. पाणीपुरवठा या विषयाचे खासगीकरण केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, दिल्ली जलबोर्डाकडून नागरिकांना दररोज 930 दशलक्ष गॅलन पाणी पुरवले जाते.
हे प्रमाण दरडोई 176 लिटर इतके आहे. यातील बरेच पाणी वाया जाते किंवा त्याला गळती लागते. तसेच पाण्याची चोरी होण्याचे प्रमाणही खूप आहे. या सगळ्या त्रुटी येत्या काही काळात कटाक्षाने दूर केल्या जातील, असे त्यांनी नमूद केले.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाची आता जबाबदारी निश्चित केली जाईल, असे ते म्हणाले. तज्ज्ञ सल्लागार नेमून ही पाणी व्यवस्था येत्या काही दिवसांत सुरळीत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.