पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना बिहारमध्ये पुन्हा सेत्तवर येण्याचा विश्वास आहे. आम्ही लोकांसाठी येथे जे काम केले आहे त्या आधारावर लोक आम्हाला पुन्हा बहुमत देतील असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही जो विकास कार्यक्रम राज्यात राबवला आहे त्याचा दुसरा टप्पा पुढील पाच वर्षात राबवला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सन 2015 च्या निवडणुकीत आम्ही सात निश्चय करून काम केले होते. त्याच्या पहिल्या टप्प्यात आम्ही जी उद्दिष्ठ ठेवली होती, ती साध्य केली आहेत,
आता आम्हाला याचा दुसरा टप्पा सुरू करायचा आहे असे ते म्हणाले. या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील युवकांचे कौशल्य वाढवणे,त्यातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांच्या उद्योजगतेला प्राधान्य आणि वाव देणे, प्रत्येक शेताला पाटाचे पाणी देणे, लोकांसाठी नवीन आरोग्य व्यवस्था निर्माण करणे ही आमची उद्दिष्ठे आहेत असे ते म्हणाले. आधी झालेल्या कामांकडेही आमची देखरेख राहील असेही त्यांनी नमूद केले.
एनडीएतील जागा वाटपाच्या संबंधात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे या विषयीची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. तुम्ही भाजप पेक्षा जास्त जागा लढवणार आहात काय असे विचारता ते म्हणाले की हे विषय जाहीरपणे बोलता येत नाहीत.
जितनराम मांझी यांचा हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि लोकजनशक्ती पक्षालाही एनडीए आघाडीत स्थान दिले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.