आंबेगाव बु., दि. 17 (प्रतिनिधी) -कात्रज ते नवले पूल बाह्यवळण रुंदीकरणाचे काम नोव्हेंबर 2019 मध्ये सुरू झाले. हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत होती. परंतु, करोनाच्या कालावधीत काम बंद असल्याकारणाने हे काम ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली. या कालावधीतही हे काम पूर्ण झाले नाही. आता पुन्हा या कामाला डिसेंबर 2022 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, हे काम अतिशय कासवगतीने सुरू असल्याने ते पूर्ण होण्यास नवे वर्ष 2023 उजाडणार अशी स्थिती आहे.
कात्रज ते नवलेपूल बाह्यवळण महामार्ग रुंदीकरण काम संथगतीने सुरू आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या या कामासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. परंतु, करोना, लॉकडाऊन यामुळे हे काम पूर्ण झालेले नाही. त्यानंतर “पीडब्ल्यूडी’कडून या कामाची तीन वेळा वाढीव मुदत घेण्यात आली.
चार कि.मी. लांबीचा हा भाग मोठ्या संख्येने निवासी गृहनिर्माण सोसायट्या, छोटी-मोठी दुकाने आणि कारखान्यांनी वेढलेला आहे, त्यामुळे येथे 24 तास प्रवाशांची तसेच अवजड वाहनांची वर्दळ असते. महामार्गाचा विस्तार केवळ 17 मीटर रुंद असल्याने दोन्ही बाजूंनी रुंदी 8 मीटरने वाढविण्याची योजना आहे. या दिशेने महामार्गाच्या दोन्ही बाजूचे डोंगराळ खडक तोडणे, अतिक्रमणे हटविणे, सेवा रस्ते बांधणे, विविध पाइपलाइन टाकणे यासह अन्य कामे सध्या सुरू असली तरी त्या कामाला वेग नाही. यामुळे दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. या भागातील नागरिकांना गेली अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विकास आराखड्यानुसार सदर रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे.
दोन अंडरपासच्या कामाला उशीर होत आहे. याचे प्रस्ताव मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे आहेत. याबाबत आपण खासदार सुप्रिया सुळे यांची मदत घेत आहोत, या कामाबाबत आवश्यक तो पाठपुरावा करीत आहोत. नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक बदल करून परिपूर्ण रस्ता विकसन व्हावे.
– युवराज बेलदरे, माजी नगरसेवक, आंबेगाव बु.
पुलाचा मुख्य कॅरेज-वे तयार आहे आणि काही अतिक्रमणे वगळता सेवा रस्ते तयार आहेत. या रस्त्याचे 30 टक्के काम बाकी आहे. उशीर झालेला असला तरी कात्रज येथील वडगाव ते नवले पुलापर्यंत चार किलोमीटरच्या सहा पदरी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत.
– महेश पाटील, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग, पुणे
कारवाई होत नसल्याने…
कात्रज ते नवलेपूल बाह्यवळण महामार्ग रुंदीकरण काम सुरू असताना अनेक वाहन चालक रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वाहने चालवत येत असल्याने अपघाताचा धोका आहे, अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे असताना कोणतीही कारवाई केली जात नाही, त्यामुळे विरूद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे, यामध्ये दुचाकीचालकांचे प्रमाण मोठे आहे, अशा चालकांचा काम सुरू असताना अडथळा येत असल्याचेही तसेच याबाबत वाहतूक पोलिसांना कटविण्यात आल्यानंतरही कारवाई होत नसल्याचे रस्त्याचे काम करणारे अभियंते, कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घ्यावा.