संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही केला मुद्दा उपस्थित
संयुक्त राष्ट्रे – पाकिस्तानला लागलेले काश्मीरचे खुळ जाण्याची चिन्हे नाहीत. त्या देशाने पुन्हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीर मुद्दा उपस्थित करून रडगाणे गायले.
संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानी दूत मलिहा लोधी यांनी सोमवारी सुरक्षा परिषदेतील एका वेगळ्याच चर्चेवेळी काश्मीर राग आळवला. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याची भारताची कृती सुरक्षा परिषदेच्या ठरावांचा भंग करणारी आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी आमच्या विभागातील लष्करी निरीक्षक गटाला आणखी बळकट करावे.
तसेच, काश्मीरमधील स्थितीवर बारकाईने देखरेख ठेवावी, अशा मागण्यांचा सपाटा लोधी यांनी लावला. काश्मीर मुद्दा मांडताना त्यांनी भारताच्या भूमिकेपेक्षा विसंगत वक्तव्ये केली. सिमला करार आणि त्यानंतर नियंत्रण रेषा (एलओसी) अस्तित्वात आल्याने संयुक्त राष्ट्रांचा लष्करी निरीक्षक गट असंबद्ध बनल्याची भारताची भूमिका आहे.