जयेश राणे
दरवर्षी जल्लोषात साजरा होणारा गणेशोत्सव या वर्षी परिस्थितीनुसार साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
गणेशोत्सव आणि महाराष्ट्र असा घनिष्ठ संबंध आहे. सार्वजनिक गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने करावा लागणार आहे. असे असले तरी उत्सव साजरा होणार आहे एवढे तरी नक्कीच आहे, असे लक्षात येत आहे. आतापर्यंत धूमधडाक्यात उत्सव साजरा करण्यात आला आहे. हे सत्य असले तरी साधेपणाने उत्सव साजरा करून सामाजिक भान जपणे, हे आद्य कर्तव्य असल्याने ते जपणे आवश्यक ठरते.
कारण परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहकार्य करणारच आहेत. तसे आश्वासन त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिले. गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मंत्रालयात गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसह व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.
आता त्या त्या विभागातील रहिवाशांचे त्यांना सहकार्य मिळणे आवश्यक आहे आणि सुजाण नागरिकांकडून ते मिळत गणेशोत्सव उत्तमप्रकारे साजरा होईल असे वाटते. कारण मार्च महिन्यापासून म्हणजे लॉकडाऊन सुरू झाल्याच्या कालावधीपासून आजमितीस करोना विविध गोष्टी शिकवत आहे. वर्तमान स्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी निश्चितच “दक्षता’ हे सूत्र विशेषकरून अधोरेखित होते.
आतापर्यंत साजरे झालेल्या गणेशोत्सवांपैकी यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे वेगळा असणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आणि गर्दी हे समीकरणच असते. 5 व 7 दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्यावर शेवटच्या दिवसांत तर गर्दीचा जनसागरच लोटतो. पण यंदा गर्दीपासूनच अंतर राखायचे आहे, अशी आता स्थिती आहे.
आपल्या विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्ते वर्गणी काढणे, मंडपासाठी परवानगी मिळवण्यासाठी नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करणे, आगमन-विसर्जन, 11 दिवस त्या ठिकाणी उपस्थित असणे आदी भाग करत असतात. 11 दिवसांच्या उत्सवाची तयारी काही दिवस आधीपासूनच सुरू झालेली असते. तेव्हा प्रत्यक्ष गणेश चतुर्थी दिवशी विभागातील नागरिकांना स्थानिक गणेश मंडळातील कार्यकर्ते करत असलेली मेहनत पाहाण्यास मिळते. हा उत्सवच असा आहे की, त्यासाठी त्यागी वृत्तीने काही दिवस सेवारत राहिल्याशिवाय उत्सव साजरा करता येणे कठीणच.
खरोखरच कार्यकर्ते या उत्सवानिमित्ताने झोकून देत श्री गणेशाची सेवा करत असतात. नोकरी-व्यवसाय-शिक्षण सांभाळत करत असलेली श्रीगणेश सेवा नक्कीच लक्षवेधी असते. 11 दिवस प्रत्येक विभागात एक वेगळेच सकारात्मक वातावरण असते.
महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, पुणे या शहरांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या सर्वाधिक आहे. यासह राज्यातील अन्य जिल्ह्यांतही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या चांगल्यापैकी आहे. श्री गणेशोत्सवाचा विस्तार मोठ्याप्रमाणावर असल्याने पोलीस यंत्रणेलाही सतर्क राहावे लागते. उत्सव साधेपणाने होणार असला तरी पोलिसांना जागता पहारा हा द्यावा लागणार आहे.
22 ऑगस्टपासून गणेशोत्सवास आरंभ होत आहे तो 1 सप्टेंबरपर्यंत म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत आहे. तो पर्यंतच्या कालावधीत स्थिती कशी असेल? हे आताच सांगणे कठीण आहे. कारण प्रतिदिन स्थितीत बदल होत आहे. गणेशोत्सवापर्यंत स्थितीवर नियंत्रण येईल अशीच प्रत्येकजण आशा करत असेल, यात दुमत नाही. गणेश मंडळांमार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
गणेशोत्सव हे सामाजिक जनजागृतीचे सर्वोत्तम माध्यम आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही सार्वजनिक उत्सवाची संकल्पना तत्कालीन स्थितीत अत्यंत प्रभावी ठरली. तेव्हा ब्रिटिशांचे वर्चस्व होते. त्यांना शह देण्यासाठी एकत्र येणे काळजी नितांत आवश्यकता होती. आता स्थिती अशी आहे की एकमेकांपासून अंतर राखत प्रत्येक गोष्ट करावी लागत आहे. गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक फिरण्याचा भाग अधिक असतो. त्यामुळे दक्षता बाळगणे आवश्यक असणार आहे.
जे सेवक श्रींच्या सेवेसाठी मंडपात असतील त्यांच्या संख्येवरही मर्यादा असणार आहे. अर्थातच आरतीचा भाग वगळता मंडपात फारशी गर्दी नसते. ज्या ठिकाणी चलचित्र, देखावा आदी समाजप्रबोधनपर काही भाग दाखवण्यात येत असतो, त्याठिकाणी ते चलचित्र पाहण्यासाठी दर्शकांची गर्दी होत असते. उत्सवामध्ये आरास, सजावट, आगमन-विसर्जन यागोष्टी साध्या ठेवण्याकडेच सर्वांचा कल असेल.