भोपाळ – भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह या सध्या विविध विकाराने त्रस्त आहेत. तशातच त्यांच्या एका डोळ्याची दृष्टीही गेली आहे. नऊ वर्ष कॉंग्रेसने आपल्याला कोठडीत ठेऊन आपला तेथे अनन्वीत छळ केला त्यामुळेच आपली तब्बेत बिघडली असल्याचा आरोप त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.
आंतरराष्ट्रीय योग दिना निमीत्त भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. साध्वी प्रज्ञासिंह या सन 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपी असून त्यांना त्या संबंधात अटक करण्यात आली होती. साध्वी भोपाळ मधून गायब असल्याच्या तक्रारी त्यांच्या मतदार संघात केल्या जात होत्या त्या विषयी विचारले असता त्या म्हणाल्या की मधल्या लॉकडाऊनमुळे मी दिल्लीहून भोपाळला परत येऊ शकले नव्हते.
मला व माझ्या कर्मचाऱ्यांना वेळेत तिकीटेही मिळू शकली नव्हती असे कारण त्यांनी त्यासाठी पुढे केले. दरम्यान कॉंग्रेस आमदार पी.सी. शर्मा यांनी त्यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की लॉकडाऊन जाहींर झाले त्यावेळी त्या भोपाळ मध्येच होत्या. नंतर त्या छोट्या आजारावरील उपचाराचे कारण सांगून दिल्लीला गेल्या त्यानंतर त्या भोपाळ मध्ये फिरकल्याच नाहीत असा दावा त्यांनी केला. कॉंग्रेस राजवटीत त्यांचा पोलिस कोठडीत छळ झाल्याचा त्यांचा दावाही आमदार शर्मा यांनी फेटाळून लावला.