मंगळुरु – कॉंग्रेसने मुस्लीम समुदायाचा केवळ व्होट बॅंक म्हणून वापर केलाच; पण त्यांच्या कल्याणासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. आता कॉंग्रेस कट्टर हिंदू नेत्यांचे पक्षात स्वागत करत आहे तर भाजपा मात्र विकासाच्या विरोधात भावनिक राजकारण करण्यात मग्न आहे. ही भाजपा-कॉंग्रेसची मिलीभगत आहे, असा आरोप जनता दल-सेक्युलर (जेडीएस) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे.
रविवारी संध्याकाळी कृष्णपुरा येथे कुमारस्वामी यांनी त्यांच्या पक्षाचे मंगळुरु उत्तरचे उमेदवार मोहिउद्दीन बावा यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीत असाही आरोप केला की, दोन्ही राष्ट्रीय पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी तरुणांची दिशाभूल करत आहेत.
भाजप सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिल्लव समाजाची मते लक्षात घेऊन ‘बिल्लव विकास महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, मतदार कॉंग्रेस-भाजपच्या मिलीभगतला बळी पडणार नाहीत. जनता दलाबाबत (धर्मनिरपेक्ष) विश्वास निर्माण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार आज संध्याकाळी संपला. मात्र, त्याआधी राज्यातील तीन प्रमुख राजकीय पक्ष – भाजप, कॉंग्रेस आणि जेडीएस यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. आज तिन्ही पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांनी निवडणूक रॅलींना संबोधित केले.