कर्जत : सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी कर्जत तालुका आयोजित “दाखले आपल्या दारी’ संकल्पनेअंतर्गत 200 सरकारी दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
सध्याची परिस्थिती आणि वेळ पाहता विद्यार्थी मित्रांवर आलेले संकट हेरून सह्याद्री प्रतिष्ठान अंतर्गत सह्याद्री विद्यार्थी अकादमी कर्जत विभागाने येणाऱ्या विद्यालयीन कामकाजासाठी तात्काळ लागणारे महत्वाचे दाखले म्हणजेच उत्पन्नाचा दाखल, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्वचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला मोफत आणि घरोघरी पोहचवण्याची जबाबदारी घेतली.
त्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी कंबर कसली सुद्धा. सुरवातीला तहसीलदार विक्रम देशमुख आणि नायब तहसीलदार संजय भालेराव यांची भेट घेऊन इच्छुक आणि गरजू यांची नाव नोंदणी करून घेतली, त्यानंतर प्रत्यक्ष गावो गावी जाऊन सर्व दुर्गसेवकांनी नाव नोंदणी केलेल्यांना फॉर्म वाटप केले. नियमानुसार लागत असलेल्या कागदपत्रांची यादी सुद्धा दिली फॉर्म, फॉर्म भरून झाल्यानंतर त्यांना ज्या गावी दिले त्याच गावातून हे फॉर्म जमा करून ते तात्काळ तपासून तहसील कार्यालयात जमा केले.
फॉर्म घेण्या आणि देण्यापासून, तलाठी पंचनामा करत असतानाच काही वेळेस फॉर्म भरण्यास सुद्धा दुर्गसेवकानी विद्यार्थी मित्रांना आणि ज्येष्ठांना मदत केली. संपूर्ण कर्जत तालुक्यातील नेरळ, शेलू, कशेळे, खांडस, कडाव, बीड, खांडपे, वेणगाव, गौरकामत या भागांतील अनेक खेड्या पाड्यात जाऊन सह्याद्री विद्यार्थी अकादमीमधील सर्व सहकाऱ्यांनी दाखल्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे जमा करून पुन्हा दाखले तयार झाल्यानंतर त्यांचे वितरण देखील केले. हे सगळं करीत असताना शासनाने करोना काळात घातलेल्या नियमांचे पालन करायला दुर्गसेवक विसरले नाहीत.
“दाखले आपल्या दारी’ या मोहिमेंतर्गत एकूण 280 दाखल्यांची नोंदणी झाली परंतु कागदपत्रांची पूर्तता करण्यास खालील पात्र ठरले अशा 200 लोकांना घरपोच दाखले देण्यात आले. 5 सप्टेंबर रोजी दाखले वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. कर्जत शहर भागातील काही दाखले शिशु मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका व सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या मार्गदर्शिका रेखा गोरे यांच्या हस्ते दाखले वितरण करून दाखले वितरणाच्या मोहिमेला प्रारंभ झाला.
या कार्यक्रमात कर्जतच्या वेगवेगळ्या भागासाठी सुधीर साळोखे, प्रा. स्वप्नाली पाटील, मिथिलेश म्हामुणकर, हरेश मते, मंगेश रुठे, शाहीर गणेश ताम्हाणे, प्रणव जंगम, कौस्तुभ पेठे, रोहित देशमुख, हेमलता कांबळे, यतीन भोसले, नंदकुमार तांडेल, निरंजन ठाणगे, सूरज खडे, विशाल देशमुख, विक्रम विर्ले, चेतन फुलावरे, मयूर मोरे, अमोल पानमंद, पंकज ताम्हाणे, दिनेश ठाणगे, प्रमोद सावंत, नागेश भोईर, आणि रितेश वायकर या सर्व दुर्गसेवकांचा विशेष सहभाग होता. सेतू कार्यालयातील मनोज भोईर आणि त्याचे सहकारी यांचा समावेश होता.