छोट्या पडद्यावर (वाहिनीचे नाव महत्त्वाचे नाही) कपिल शर्मा शो हा कार्यक्रम खूपच हिट झाला होता किंवा अजूनही तो हिट आहे.
चित्रपटांच्या प्रमोशनच्या निमित्ताने अनेक बडे स्टार किंवा अन्य काही निमित्ताने बडे क्रिकेटपटू या कार्यक्रमाला हजेरी लावायचे. कपिल शर्मा आणि त्याची टीम मग एकदम धमाल उडवायची असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
कपिल आणि त्याच्या टीममध्ये कोणी मोठे स्टार नव्हते. मात्र, त्या कार्यक्रमाला लोकांनी एवढी उदंड प्रसिद्धी दिली की यातले सगळेच स्टार झाले. त्यातले महत्त्वाचे म्हणजे स्वत: कपिल आणि दुसरा सुनील ग्रोव्हर.
अन्य कलाकारही होते. पण त्यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी. तर झाले असे की मशूर गुलाटी, गुत्थी अथवा रिंकू अशी वेगवेगळी पात्रे सुनील ग्रोव्हर यात साकारायचा. एकाच टीममध्ये, आस्थापनेत अथवा संघात एकापेक्षा जास्त स्टार झाले की इगो, संघर्ष उद्भवतोच. त्यात नवीन काही नाही.
2016-2017 मध्ये कपिल शर्मा शोच्या बाबतीतही तसेच झाले. अगोदरच्या कुरबुरीनंतर मोठ्या भांडणात आणि कुप्रसिद्धीत परावर्तीत झाल्या. भांडणे हातापायीपर्यंत गेली आणि सुनील त्यातून बाहेर पडला.
मध्यंतरी काळ असा आला की शो ला उतरती कळा लागली. जेव्हा एखाद्या टीमला यश मिळत असते तेव्हा ते त्या एकट्याचे नसते. सामूहिक प्रयत्नांचा तो भाग असतो. मात्र, बऱ्याच जणांना त्याचा विसर पडतो. असो. मनोरंजन क्षेत्रात फार काळ कोणी खुन्नस धरून राहता येत नाही. कुठेतरी जुळवून घ्यावेच लागते.
तसे या दोघांनी म्हणजे कपिल आणि सुनीलने जुळवून घेतल्याची मध्यंतरी बातमी होती. ती खरीही आहे. त्यात आता पुढे असे जोडले जाउ लागले आहे की दोघे या शोमध्ये पुन्हा एकत्र येणार आहेत.
मात्र, सुनीलने त्याचा इन्कार केला आहे. सध्यातरी अशी काही चर्चा नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कपिल शर्मा शोचे शूटींग फेब्रुवारीपासून थांबले आहे. ते आता जुलैमध्ये पुन्हा सुरू होणार असल्याची बातमी आहे. ती मात्र खरी आहे.