मुंबई – अभिनेत्री कंगना रनौत, महाराष्ट्र सरकार, शिवसेना व खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या सोशल मीडियावर नेटकरी तोंडसुख घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कंगना व राऊत यांच्यात ज्या शाब्दीक चकमकी घडत आहेत, त्यावरून सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच सक्रीय झाले असून कंगनाला विसरा, करोनाकडे पाहा, अशा शब्दात राज्य सरकारवर आसूड ओढण्यात आले आहेत.
राज्यासमोर खूप महत्वाचे प्रश्न आहेत. विनाकारण कंगनाला महत्व देत बसू नका. करोनाचा धोका राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना रुग्णालयात बेड व ऑक्सिजन उपलब्ध होत नाहीत त्याकडे लक्ष द्या. मुळातच करोनावर उपाययोजना काय सुरु आहेत ते सामान्य माणसाला विश्वासात घेऊन सांगा, नको त्या गोष्टींना महत्व देऊ नका, अशा शब्दात सरकारला ट्रोल करण्यात आले आहे.
पावसाळा अद्याप कायम आहे, रस्ते व नाले सफाइची कामे झाल्याचे सरकार सांगते मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही. केवळ कंगनावर टीका करणे, विरोधी पक्षांवर टीका करणे व मुळ विषयाला फाटा देणे हेच उद्योग सुरु आहेत. सुशांतसिंह राजपूत, कंगना रनौट, रिया चक्रवर्ती हे राज्याबाहेरचे पण भांडणे महाराष्ट्रात सुरु आहेत.
हा पोरखेळ थांबवा व करोनाकडे पाहा. आज जनतेला करोनापासून वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर उयाप करणे गरजेचे आहे. कोणाचे बांधकाम अवैधपणे केले गेले आहे ते पाहण्यापेक्षा सध्या करोनातून कसे बाहेर पडता येइल याकडे लक्ष द्या, असा टोलाही सरकारला लगावण्यात आला आहे.