रोहन मुजूमदार
पुणे – पुरंदर तालुक्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्होंबर तर यावर्षी सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: उद्ध्वस्त केले आहे. रब्बी हंगामाचे पीक काढणीला आले तेव्हा करोना व लॉकडाऊनमुळे ते विकता आले नाही, त्यानंतर जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या तर आता पुन्हा ढगफुटी सदृश्य पावसामुळे हातातोंडाशी अलेला घास हिरावला गेला असल्याने बळीराजा निसर्गाच्या चक्रव्युहात अडकला आहे. आता यातून बाहेर येण्यासाठी त्यास सरकारच्या “हाता’ची नितांत आवश्यकता आहे. आणि हा हात जर मिळाला नाही तर तो पूर्णत: कोलमडून जाईल, अशी परिस्थितीनी निसर्गाने त्याच्यावर आणून ठेवली आहे.
तालुक्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्होंबर महिन्यांत कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली बाजरी, भुईमूग, मका, कांदा ही पिके अक्षरशः सडून गेली. बाजरीच्या कणसांची कापणी पूर्ण झाली होती. मात्र, सतत बरसणाऱ्या पावसामुळे बाजरीच्या कणसांना अक्षरशः कोंब फुटली होती. कांदा जमिनीतच सडला तर भुईमुगाच्या शेतात पाणी साचल्यामुळे भुईमुगाच्या पिकाचे नुकसान झाले होते. तर यंदा ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिके झोपली आहेत. तर जमिनीवर फळांचा सडा पडला असून गेल्यावर्षी सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
काही ठिकाणी शेतांचे बांध फुटून शेतातील माती व पिके सर्वच वाहून गेले आहे. तालुक्यातील सुपीक जमिनी मुरमाड बनत चालले आहेत क्षारपड जमिनींचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे येणाऱ्या रब्बी हंगामाच्या पिकांवर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, सतत बरसणाऱ्या पावसामुळे गव्हाच्या पेरण्या देखील लांबण्याची भीती व्यक्त होत आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिल्यास खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून जाणार का, अशी दाट शंका निर्माण होऊ लागली आहे.
- पंचनामे होतील पण नुकसानभरपाई?
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पुरंदर तालुक्याला गेल्या वर्षांपासून वरुणराजाने आले रौद्ररुप दाखवले आहे. तालुक्यातील शेतात पाणी साचून शेताचे तळ्यांमध्ये रूपांतर झाले आहे. फळबागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासकीय पंचनामे वेळेत होतीलही पण नुकसानभरपाई बाबतही शासंकताच आहे. तर काही शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये विम्याचे हप्ते पैसे भरले आहेत मात्र, त्या निकषात पुरंदरचा शेतकरी बसेल की नाही, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
- बराकीतील कांदा सडू लागला
कांद्याला भाव वाढेल ही आस लावून बसलेल्या काही शेतकऱ्यांनी कांदा न विकता तो बराकीत ठेवला. मात्र, सलग दोन तीन दिवस झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बराकीत पाणी शिरल्याने कांदा खराब होऊ लागला असून कोंब फुटत आहेत. त्यामुळे हा कांदा विकण्यसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असली तरी हवा तेवढा भाव मिळत नाही. दरम्यान, कांदा रोपांसह बियाणांचे भाव गगनाला भिडले असले तरीसुद्धा नवीन लागवडीसाठी बळीराजाने कंबर कसली आहे.