दावडी, (वार्ताहर) – औद्योगिकरणासाठी संपादन करताना कनेरसर गावातील सर्व गायरान जागा घेतल्याने यात्रा व इतर सार्वजनिक उपक्रमासाठी जागा उपलब्ध नाही. आदिवासी ठाकर समाजाला भूमिहीन करून तीन गुंठे जागेत 400 स्क्वेअर फुटची घरे बांधून दिली.
जागा एमआयडीसीच्या नावावर व अनेक घरांची दुरवस्था झाली आहे. खेळाचे मैदान, पाणी, इतर सुविधा कागदावरच आहे. त्यामुळे न्यायासाठी कनेरसर (ता. खेड) ग्रामस्थांनी पुण्यातील एमआयडीसी कार्यालय येथे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.
यावेळी भाजपचे अमर बोर्हाडे, ज्ञानेश्वर शिंदे, अजय खंडागळे, सुरेश गावडे, काळुराम गावडे, सचिन शिंदे, नीलम शिंदे, अनिता खंडागळे, अंजना शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे म्हणाले की, औद्योगिकरणातून विकास होत असला तरी स्थानिक ग्रामस्थांची पिळवणूक होत आहे.
ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन गावाला सार्वजनिक उपक्रमासाठी जागा दिली जावी, अशी मागणी केली होती,त्यांच्या आदेशानुसार तहसीलदार कार्यालयाने सर्वेक्षण केले; परंतु संबंधित मोकळी जागा एमआयडीसीच्या नावावर आहे. याबाबत तातडीने निर्णय झाला पाहिजे अशी मागणी केली.
एमआयडीसी व खेड सिटीने तातडीने दुरवस्था झालेल्या घरांची डागडुजी, पाणीटंचाई व मुलभुत सुविधांची पुर्तता केली पाहीजे.
– दिलीपराव माशेरे, उपाध्यक्ष, खेड तालुका, भाजप
एमआयडीसी, खेड सिटी व आंदोलक यांची संयुक्त, बैठक होऊन कार्यवाहीबाबत ठोस लेखी दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन केले जाईल.आदिवासी ठाकर समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.- सुनीता केदारी, सरपंच, कनेरसर.