खालापूर, (वार्ताहर) – घोडीवली गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत बुधवारी (दि. २८) मध्यरात्रीच्या दरम्यान पाच घरांचे कडीकोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन घरांमध्ये कोणीही राहत नसून तीन घरातील रहिवासी गाढ झोपत होते. कपाट आणि इतर सामान अस्ताव्यस्त केले. मात्र काही ऐवज चोरीला गेले नसल्याचे घरच्यांचे म्हणने असून सदर चोर फेरीवाले असू शकतात असे गावकऱ्यांचे म्हणने आहे. तर चोरीचे प्रमाण वाढल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील घोडीवली गावात बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान संदीप गंगाराम पिंगळे, ज्ञानेश्वर हळुराम पिंगळे, सुनील महादू पिंगळे, सुरेश वामन भोसले, सुशांत अंनत पालांडे यांच्या घराच्या दरवाज्याचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांना घरात प्रवेश केला.
यादरम्यान घरातील कपाट इतर सामान अस्तव्यस्त केले असता काहीही सापडले नाही. घरातील माणसे जागी झाल्याची चोरट्यांची कुणकुण लागताच तेथून पळ काढला आहे. दरम्यान दोन घरे कायम बंद असल्यामुळे काही सापडले नाही. तीन घरांमधील सामान अस्तव्यस्त केले होते. सदर घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामे केले आहेत.
चोरीच्या घटनांत वाढ काही महिन्यांपर्वी घोडीवली – नावंढे गावात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. चोरट्यांनी हजारो रुपयांची रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्यामुळेया चोरट्याला पकडणे खालापूर पोलीसांपुढे मोठे आव्हान होते. खालापूर पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या सहाय्याने रात्रभर जागता पहारा देत होते. परंतु,चोर चकवा देत वेगवेगळ्या पद्धतीने चोरी करत होता.
हाच चोर नावंढे येथे चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला व फुटेजवरून पोलिसांनी चोरट्यांचे
स्केज बनवून पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला जेरबंद करण्यात खालापूर पोलिसांना यश आले होते. आता घोडीवली पुन्हाघरफोडी झाल्याने गावात भितीचे वातावरण आहे.
गावामध्ये मंदिराच्या ठिकाणी सीसीटिव्ही आहेत. परंतु, चोरी ही जास्त वस्ती असलेल्या ठिकाणी झाली आहे. त्याठिकाणी कोणतीही व्यक्ती निदर्शनास आढळून आली नसल्यामुळे पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत. – वैशाली पिंगळे, पोलीस पाटील.