Kamal Nath| मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मुद्द्यावरून पक्षात वादाची वादळे उठली आहेत. पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर उसळलेल्या १९८४ च्या शीख दंगलीतील आरोपी कमलनाथ यांना पक्षात घेतल्यास शीख समुदायात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये नुकसान होऊ शकते.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शीख समुदायाचे प्रभावी नेते सरदार आरपी सिंह यांनी सांगितले की,कमलनाथ यांचा पक्षात समावेश केल्यास शीख समाजातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. पक्षनेतृत्व सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे.
पक्षाच्या शीख नेत्यांचा असा दावा आहे की त्यांनी पक्षाच्या योग्य व्यासपीठावर त्यांचे विचार मांडले आहेत आणि कमलनाथ यांना पक्षात घेण्याबाबत त्यांचे मतभेद नोंदवले आहेत.
काँग्रेस नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात असताना आणि लोकसभा निवडणुकीत ३७० जागा मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सज्ज होण्यास सांगत असताना पक्षात वाद सुरु झाले आहेत.
पक्षाच्या शीख नेत्यांचे म्हणणे आहे की, भाजप त्यांना न्याय मिळवून देईल, असे सांगून आतापर्यंत ते शिख समाजातील लोकांकडून मते मागत आहेत.
जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांच्यासह कमलनाथ हे १९८४ च्या शीख दंगलीत दंगलखोरांचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये होते. या दंगलींमध्ये ३५०० हून अधिक शीख मारले गेले. या दंगलीतील सहभागाबद्दल काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आहे, तर जगदीश टायटलर यांच्यावर न्यायालयीन कारवाई सुरू आहे.