जवळार्जुन, (वार्ताहर) – मावडी कडेपठार (ता. पुरंदर) गावातील कृषी पदवीधर तरुणांनी शेतीची कास धरत अल्प पाण्यावर कलिंगड आणि टरबूजाची लागवड करीत लाखो रुपयांची कमाई केली आहे.
शेतकरी खरंच कुठे चुकतो? हे गुपित शोधले मावडी कडेपठारमधील विशाल व सागर पवार या कृषी पदवीधर भावंडांनी त्यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर कष्टाच्या बळावर दर्जेदार कलिंगड आणि टरबुजाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. पारंपरिक पीक न घेता कमी कालावधीत कमी कष्टात जास्तीत जास्त उत्पन्न घेत जे बाजारात खपत ते चांगले विकत तेच पिकवायचे हे धोरण ठेवून गेल्या तीन-चार वर्षांपासून उच्च प्रतीच्या बियाणांचे कलिंगड व खरबूज लागवड करून उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे.
गेल्या वर्षी 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. पवार बंधुंनी जेजुरी-मोरगाव रस्त्यावर जवळार्जुन पाटी जवळील शेतीमध्ये कलिंगड आणि टरबूजाची या नगदी पिकांची लागवड अल्प पाण्यावर मल्चिंग पेपरचा वापर करून एकाच बेडच्या साह्याने दोन पिके घेतली. तसेच शेती लगत रस्त्यावर ही ताजे फळे विकून शेतकर्याबरोबरच व्यावसायिकांचीही भूमिका बजावली.
स्वतःची 25 एकर शेती असताना देखील चार ते पाच एकर शेती भाडेतत्वावर घेऊन त्यातही या पिकांची लागवड त्यांनी केली आहे. आपल्या बरोबर इतर तरूण शेतकरी शेतीक्षेत्रातील नवतरुण युवकांपुढे आदर्श निर्माण करीत त्यांनादेखील शेतीच्या कामासाठी तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन करतात. शेती कधीही तोट्यात नसते; परंतु तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर करून केली पाहिजे, असे पवार बंधूंनी सांगितले. या कार्यात संपूर्ण कुटुंब त्यांची मदत करीत आहेत.
यंदा 10 लाखांच्या नफ्याची अपेक्षा
चालू वर्षी 4 एकर क्षेत्रावर मेलोडीया जातीच्या बियाणे वापरून कलिंगडाची 25 ते 30 दिवसांच्या फरकाने 3 एकर कलिंगड व 1 एकराच्या टप्प्याने लागवड तर मृदुला जातीचे बियाणे वापरून टरबूज पिकांची लागवड केली आहे. उत्पादन खर्च 3 लाख एवढा आला असून सध्या 25 किलो दराने कलिंगड विक्री होत आहे. अंदाजे 55 ते 60 टनांपर्यंत उत्पादन मिळेल त्यामधून 12 ते 15 लाखांचे उत्पन्न मिळेल. खर्च वजा करून 10 लाखांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असल्याचे पवार बंधुंनी सांगितले.