अरुण गोखले
जिवीने मांडलेला प्रपंच आणि त्याला साधावासा वाटतो तो परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी त्याने कशा साधायच्या हे संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी त्यांच्या हरिपाठातून मोठ्या कुशलतेने सांगितलेले आहे. हरिपाठ हा संसार आणि परमार्थ यांना जोडणारा एक सुंदरसा सेतू आहे. माऊली आपल्याला संसार सोडायला सांगत नाहीत. कुठे डोंगरदऱ्यात जायला सांगत नाहीत. ते आपल्याला एक साधी सोपी बैठक घालायला सांगतात. तीपण कधी तर साऱ्या दिवसाची आपली प्रापंचिक यातायाती झाल्यानंतर, कुठे? तर आपल्या घरात अगदी अंथरुणावर निजण्यापूर्वी आणि करायला काय सांगतात तर… देवाचीये द्वारी, उभा क्षणभरी…
ज्ञानेश्वर महाराज सांगतात की- बाबारे! तुझी दिवसभराची प्रापंचिक धावाधाव झाली ना? मग आता स्थीर बस. डोळे मीट, देवाचे ध्यान कर, त्याला आठव. तू तुझ्या चाललेल्या श्वासोच्छ्वासावर लक्ष दे. हा सारा खेळ खेळवणारा तो आतला कोण? हे पाहण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न कर. त्यासाठी तू हरिपाठ म्हण. त्यासाठी देवाच्या दारात उभा राहा आणि तुझे क्षण भरून घे. क्षणभरी ह्याचा अर्थ निमिषमात्र किंवा अल्पकाळ असा नाही तर तू तुझ्या जीवनातला प्रत्येक क्षण आणि क्षण भरून घे.
आता क्षण म्हणजे काय? तर श्वास आणि उच्छ्वास यातील पोकळी म्हणजे क्षण. पापणीच्या उघड झापीचा काळ म्हणजे क्षण. आपण आपल्या जीवनातील अनेक गोष्टी करत असतानाही असे क्षण असतात. उदा. टी. व्ही. पाहणे, गप्पा मारणे, प्रवास करणे, पुस्तक वाचणे, लिखाण करणे इ. तिथेही हे क्षण आहेतच पण ते पोकळ असतात, भरलेले नसतात. रिक्त असतात.
मात्र, एखादी आवडती व्यक्ती भेटली, बहुमोल असा बोध कानी पडला, अनुपम्य असे एखादे निसर्गदृश्य पाहिले, आवडत्या गाण्याची ओळ कानावर पडली की नकळत आपलं मन हे एका आगळ्यावेगळ्या अशा आनंदाने, समाधानाने भरून येते. ही त्या संसारातील रिक्त क्षण भरले गेल्याची खूण असते. मग आपणच अशा जीवनातील काही अविस्मरणीय अशा क्षणांनाच भाग्याचे क्षण असे म्हणतो.
हे जसे प्रपंच्यात तसेच आपण आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दु:खाची सांगड देवाशी घालून त्याचे स्मरण करीत आपल्या जीवनात प्रत्येक क्षण हा त्या प्रभूप्रेमाच्या निखळ आनंदाने भरून घेणे हीच हरिपाठाची शिकवण आहे.