राजुरीत चौथ्यादिवशी जनावरे फस्तचा सपाटा
बेल्हे – राजुरी येथे बिबट्याचे पाळीवर जनावरांवर हल्ले करून फस्त करण्याचा सपाटा सलग चौथ्या दिवशीही कायम आहे. राजुरी (ता. जुन्नर) येथील डौले मळ्यात गुरुवारी (दि. 19) दुपारी तीनच्या सुमारास लक्ष्मण कमलाकर डौले यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. यावेळी डौले या वासराच्या काही फूट अंतरावर असलेल्या आपल्या शेतात काम करत होते.
बिबट्याने अचानक वासरावर हल्ला केल्याचे त्यांनी पाहिले आणि आरडाओरडा केला. या आवाजाने बिबट्या या ठिकाणाहून पळून गेला; परंतु या झाल्ल्यात वासरू जागीच ठार झाले. दरम्यान राजुरी परिसरात चार दिवसांत चार वासरे व मेंढ्या बिबट्याने हल्ला करून ठार केल्या आहेत.
याबाबत वनविभागाचे अधिकारी जे. बी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार राजुरी येथे उंचखडक वस्तीवर राहत असलेले सीताराम आनंदा शेटे यांच्या कालवडीवर सोमवारी (दि. 16) एक महिन्याचे वासरू पहाटेच्या सुमारास गोठ्यातून ओढून नेऊन बिबट्याने फस्त केले.
निवृत्ती कणसे यांचे 7 महिन्याचे गायीचे वासरू बुधवारी (दि. 18) पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले आहे, तसेच पहाटेच्या सुमारास बाबाजी शिवाजी गुळवे यांच्या घराजवळच असणाऱ्या गोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या. या शेळ्यांवर देखील मंगळवारी (दि. 17) बिबट्याने हल्ला करून दोन मेंढ्यांचे कोकरू जागीच ठार केले. याच गावातील गोगडी मळ्यामधील मुक्तार कासम पटेल यांच्या दोन वर्षांच्या जरशी कालवडीवर बिबट्याने बुधवारी (दि. 18) रात्री हल्ला करून ठार केले आहे.
पिंजरे लावयाचे तरी किती?
राजुरी हे गाव बिबट्या प्रवण क्षेत्र असून या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात उसाचे मोठे क्षेत्र असून या बिबट्यांना लपण्यासाठी जागा आहे. सध्या येथे ऊसतोडणी सुरू असल्याने बिबट्याच्या लपण्याच्या जागा कमी होऊ लागल्याने हे बिबटे मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने ठोस पावले उचलली पाहिजेत. वन विभागाकडे पिंजऱ्यांचे प्रमाण देखील कमी असल्याने पिंजरा लावायचा कुठे कुठे लावायचा असा गंभीर प्रश्न या अधिकाऱ्यांसमोर आहे.