समाविष्ट गावांसह प्राधिकरण, थेरगाव, भोसरीतही नियोजन
पिंपरी – महापालिकेने काही प्रमुख समाविष्ट गावांसह थेरगाव, प्राधिकरण, भोसरी आदी भागांमध्ये पाणी पुरवठ्याशी संबंधित 201 कोटी 52 लाख रुपयांची कामे हाती घेतली आहेत. या कामामध्ये 26 उंच पाण्याच्या टाक्या उभारल्या जाणार आहेत. त्याशिवाय, जमिनीखालील 4 पाण्याच्या टाक्या (संपवेल) आणि 4 पंम्पिग स्टेशनची उभारणी केली जाणार आहे.
महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठाविषयक हाती घेतलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट गावांतील डुडुळगाव, चोवीसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, चिखली, मोशी, वाकड, किवळे, पुनावळे, ताथवडे आदी गावांचा समावेश आहे. त्याशिवाय, प्राधिकरणातील पेठ क्रमांक 7 आणि 10, तसेच थेरगाव आणि भोसरी भागांसाठी ही पाणी पुरवठाविषयक कामे नियोजित आहेत. शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखांवर जाऊन पोहचली आहे. लोकसंख्या वाढीबरोबर शहरातील नागरिकांची पाणीपुरवठ्याची मागणी देखील वाढणार आहे.
महापालिकेत 1997 मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गेल्या 22 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. तसेच, सध्याही संबंधित गावांमध्ये विविध गृहप्रकल्पांची कामे जोमात सुरू आहेत. अशा परिस्थितीत निर्माण होणारा पाणी प्रश्न लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आंद्रा व भामा आसखेड धरणातून एकूण 267 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्याचे नियोजन केले आहे. त्या दृष्टीने प्रथम प्राधान्याने आंद्रा धरणातून तर त्यानंतर भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध केले जाणार आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेता समाविष्ट गावांमध्ये पाण्याच्या टाक्या, संपवेल, पंम्पिग स्टेशन आदी कामांबरोबरच एकूण 55 किलोमीटर लांबीच्या विविध व्यासाच्या मुख्य जलवाहिन्या टाकण्याचे कामे महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहेत. त्याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
गावनिहाय नियोजन काय?
महापालिकेतर्फे एक चार पॅकेजमध्ये पाणीपुरवठाविषयक कामे नियोजित आहेत. पहिल्या पॅकेजमध्ये डुडुळगाव, चोवीसावाडी, वडमुखवाडी आणि चऱ्होली आदी भागांसाठी 8 उंच पाण्याच्या टाक्या, प्रत्येकी 1 संपवेल आणि पंम्पिग स्टेशन तसेच मुख्य जलवाहिन्यांची कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी 48 कोटी 34 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चिखली आणि मोशी भागासाठी पॅकेज- 2 अंतर्गत 45 कोटी 86 लाख रुपये रकमेची कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये दोन उंच पाण्याच्या टाक्या आणि मुख्य जलवाहिन्यांची कामे नियोजित आहेत. पॅकेज तीनमध्ये मुख्य जलवाहिन्या, 7 उंच पाण्याच्या टाक्या, प्रत्येकी 1 संपवेल आणि पंम्पिग स्टेशन होणार आहे.
वाकड, थेरगाव, पेठ क्रमांक 7 आणि 10 तसेच भोसरी भागासाठी ही कामे केली जाणार आहेत. त्यासाठी 55 कोटी 52 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. पॅकेज चारमध्ये 8 उंच पाण्याच्या टाक्या, प्रत्येकी दोन संपवेल आणि पंम्पिग स्टेशन होणार आहे. त्यासाठी 51 कोटी 78 लाख रुपयांचा खर्च नियोजित आहे. पुनावळे, ताथवडे, किवळे आदी भागांसाठी प्रामुख्याने ही कामे केली जाणार आहेत.