Atishi Press Conference| दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यानंतर त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर केजरीवाल यांना दिल्लीतील तिहार तुरूंगात हलवण्यात आले आहे.
याप्रकरणी आपसह विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. यातच आता दिल्ली सरकारमधी मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत एक गौप्यस्फोट केला आहे. माझ्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून मला भाजपमध्ये प्रवेश करण्याचा दबाव आणला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली – आतिशी
“भाजपमध्ये सामील झाला नाही तर ईडीकडून अटक केली जाईल. निवडणुकीपूर्वी आपच्या 4 नेत्यांना अटक करण्याची तयारी सुरू आहे. मला एका जवळच्या मित्राने भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पंतप्रधान मोदी आणि भाजपने आप नेत्यांना संपवण्याचा निश्चय केला आहे. आपचे वरिष्ठ नेते अटकेत आहेत. आता पुढच्या काही दिवसांत आपच्या नेत्यांना अटक होण्याची शक्यता आहे,” असे आतिशी यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या, “आम आदमी पक्षाच्या चार मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं जाईल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या खासगी निवासस्थानी ईडीची रेड होईल. माझं कुटुंब आणि नातेवाईकांच्या घरी छापा पडू शकतो आणि आमच्या सगळ्यांना समन्स पाठवून पुन्हा अटक केली जाऊ शकते.”
यावेळी आतिशी यांनी भाजपला कडक शब्दांत खडसावले आहे. ”आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाहीत. आम्ही सुद्धा भगत सिंगांचे शिष्य आहोत, केजरीवाल यांचे सैनिक आहोत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात देश वाचवण्याचं काम करत राहणार आहोत. तुम्ही प्रत्येक आमदाराला जेलमध्ये टाका, त्याच्या जागेवर आणखी 10 जण लढण्यासाठी सज्ज होतील,” असा इशारा आतिशी यांनी दिला.
कोणत्या चार नेत्यांना अटक होण्याची शक्यता आहे ?
येत्या दोन महिन्यात, लोकसभा निवडणुकीच्या आधी आपच्या चार नेत्यांना अटक केले जाऊ शकते. माझ्यासह सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्डा यांनाही अटक होऊ शकते. भाजपमध्ये प्रवेश न केल्यास अटक करण्याची धमकी दिली जात असल्याचे आतिशी यांनी सांगितले.
हेही वाचा: