मुंबई – शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यानी बंडखोरी करत भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. यातच आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील अजित पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार असल्याचं बोललं जात आहे.
रविवारी 6 जानेवारी 2023 रोजी गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले असताना जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतल्याचे म्हंटले जात होते. मात्र याबाबत स्वत: समोर येऊन या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिला. “मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटल्याच्या चर्चाही निराधार आहे, असा दावा करत मी कुठेही गेलो तरी तुम्हाला सांगून जाईन,” असे जयंत पाटील म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही स्पष्टीकरण दिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत लिहिले की, “राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे. जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले, ते मंत्री होणार, त्यांनी गावातून लोक बोलावली, अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. ही पेरणी कशासाठी केली जातेय, हे आम्हांला बरोबर समजतंय. जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की, ‘जितेंद्र साहेबांनी इशारा दिलेला आहे लढायचंय आणि आता थांबणे नाही.’
पुढे त्यांनी लिहिले की, “मला वाटत नाही की, प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की, ‘आम्ही लढणार आहोत, आम्ही लढणार आहोत.’ आम्ही मागेच सांगितल आहे की, “आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.” त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आमचं ठरलंय, आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही.”
राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे… pic.twitter.com/1wVpMBG2LZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 6, 2023
याशिवाय जितेंद्र आव्हाड यांनी सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही, असेही म्हंटले आहे.