कोल्हापूर- राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं शेतकर्यांसाठी अनेक घोषणा केल्या. पण प्रत्यक्षात एकाही घोषणेची पुर्तता केलेली नाही. गेल्या वर्षीचा महापुर आणि यंदाचा अवकाळी पाऊस यामुळं शेतकर्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पण अजुनही शेतकर्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसंच प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना व्याज सवलत आणि जाहीर केलेल्या ५० हजार रूपयांची मदत मिळालेली नाही.
तसंच वीज बील माफीच्या आश्वासनाची पुर्तता करण्यात आलेली नाही. एकीकडं शेतकर्यांचा कळवळा असल्याचं महाविकास आघाडी सरकारचे नेते भासवतात. पण प्रत्यक्षात शेतकर्यांच्या हिताचा कारभार होत नाही.
त्यामुळंच महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी, भाजप आणि किसान मोर्चा यांच्यावतीनं, शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झुणका भाकर- खर्डा आंदोलन करून धरणं धरलं जाईल. या आंदोलनात शेतकर्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी केलं आहे. आंदोलनासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.