भाजप सत्ता राखणार की सत्ता परिवर्तन?
रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल उद्या (सोमवार) जाहीर होणार आहे. त्यामुळे भाजप त्या राज्याची सत्ता राखणार की सत्ता परिवर्तन होणार ते स्पष्ट होईल.
झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा आहेत. त्यासाठी पाच टप्प्यांत मिळून 65 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. आता मतमोजणीबाबत उत्सुकता आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी त्रिशंकू स्थितीचे भाकीत करतानाच विरोधकांच्या महाआघाडीला झुकते माप दिले आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष निकाल काय असणार याकडे लक्ष लागले आहे. झारखंडमध्ये प्रमुख लढत सत्तारूढ भाजप आणि झामुमो, कॉंग्रेस, राजदचा समावेश असणाऱ्या विरोधकांच्या महाआघाडीत आहे. इतर लहान पक्षही रिंगणात आहेत. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास लहान पक्षांचे महत्व वाढण्याची शक्यता आहे.
झारखंडआधी महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या दोन्ही राज्यांत भाजपचे संख्याबळ घटले. हरियाणात इतर पक्षाला बरोबर घेऊन सत्ता राखण्यात भाजपला यश आले. मात्र, महाराष्ट्रात त्या पक्षाला सत्तेने हुलकावणी दिली. त्यामुळे राजकीय प्रतिष्ठेसाठी झारखंड जिंकणे भाजपच्या दृष्टीने महत्वाचे बनले आहे.
स्थानिक मुद्दे लावून धरतानाच भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केल्याचा आरोप करत विरोधक झारंखडमधील निवडणुकीला सामारे गेले. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू असताना त्या राज्यात मतदान झाले.
आता त्या बाबींचा किती आणि कसा परिणाम झारखंडमध्ये होणार ते निकालातून उघड होईल. दरम्यान, मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष विचारात घेऊन निकालाआधी झारखंडमधील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास कुणाला बरोबर घेता येईल, याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यातून विविध राजकीय पक्ष एकमेकांशी संपर्क साधत असल्याचे समजते.