राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप व शिंदे गटावर आज जोरदार निशाणा साधला. यावेळी पाटील यांनी, आपला लढा कोणाविरोधात आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या शिबिरात ते बोलत होते. जयंत पाटील यांनी यावेळी शिंदे गट व भाजप आमदारांबाबत केलेलं एक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करावे लागत असल्याने भाजपच्या १०५ आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले, “भाजपच्या १०५ मध्ये अस्वस्थता आहे कारण हे सरकार ४० जणांसाठीच काम करत असल्याची भीती भाजप नेत्यांमध्ये आहे.”
जयंत पाटलांच्या दाव्यात किती हवा?
राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोलमडून शिंदे भाजप सरकार सत्तेत आले. हे सरकार स्थापन होत असताना भाजपचे १०५ आमदार व शिंदे गटाचे ४० आमदार असल्याने मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडेल अशी चर्चा होती. मात्र असं न होता भाजप नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास टाकत फडणवीसांना त्यांचे डेप्युटी म्हणून नेमले. आपण मंत्रिममंडळात नसू असे फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतरही पक्ष नेतृत्वाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडले होते.
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर बसवल्याने राज्यातील भाजप आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आजही दबक्या आवाजात सुरु आहे. शिंदे – भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर खुद्द फडणवीस यांनी देखील एका कार्यक्रमात आमदारांना उद्देशून बोलताना, जास्त अपेक्षा न ठेवण्याचा सल्ला दिला होता. यानंतर भाजप आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या, अस्वस्थता असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या मात्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी या केवळ चर्चाच असल्याचं स्पष्ट केलं. यामुळे जयंत पंपातील यांनी आज केलेल्या दाव्याबाबत या आधीही चर्चा झाली असली तरी त्याबाबत ठोस असे काही हाती आलेले नाही.