अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्या येथे महर्षि वाल्मिकी विमानतळ, नवे रेल्वे स्टेशन आणि नव्या रेल्वेगाड्यांसह अनेक विकासकामांचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी सर्व देशवासियांनी येत्या २२ जानेवारी रोजी दिवाळी साजरी करावी असे आवाहन करतानाच २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे ज्यांना आमंत्रण आहे त्यांनीच त्या दिवशी अयोध्या येथे यावे असेही आवाहन केले आहे. तुम्ही ५५० वर्षे वाट पाहिली आहे, आणखी थोडे दिवस थांबा असे त्यांनी म्हटले आहे.
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अयोध्येला येण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र प्रत्येकाने तसे येणे शक्य होणार नाही. त्यामुळे सर्व रामभक्तांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्या दिवशी सगळे विधिपूर्वक कार्यक्रम झाल्यानंतर नंतर प्रत्येकाने आपापल्या सोयीने अयोध्येला भेट द्यावी. आताच येथे येण्याची कोणी मनाची तयारी करू नये असे मोदी म्हणाले.
अयोध्येतील या भव्य सोहळ्याची तयारी अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि तेथील आयोजनात कोणता अडथळा निर्माण होऊ नये. मंदिर अनेक शतके येथेच राहणार आहे. ते कुठे जाणार नाही. त्यामुळे त्याच दिवशी गर्दी करू नये. काही लोकांनाच सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना आमंत्रण आहे त्यांनीच यावे.
२३ तारखेनंतर सगळ्यांना प्रवास करणे सुकर होऊन जाईल असे नमूद करतानाच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी प्रत्येकाने आपापल्या घरात दिवा लावावा असे आवाहन त्यांनी केले. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला हा एक ऐतिहासिक क्षण आहे.त्यानिमित्त सर्व १४० कोटी भारतीयांनी आपल्या घरात श्रीराम ज्योती प्रज्ज्वलीत करून दिवाळी साजरी करावी असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी अयोध्यावासियांना यावेळी अयोध्य नगरी स्वच्छ करण्याचे आवाहन केले. अयोध्येतील लोकांना आता लाखो भाविकांच्या स्वागतासाठी तयार राहवे लागणार आहे. अनंत काळापर्यंत येथे आता भाविक येत राहणार आहेत. त्यामुळे अयोध्यावासियांनी अयोध्येला देशातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर बनवण्याची शपथ घ्यावी असे ते म्हणाले.
४ कोटी लोकांना मिळाले पक्के घर
मोदी म्हणाले की एक काळ असा होता की रामललांचे तंबूमध्ये वास्तव्य होते. आता त्यांना पक्के घर मिळाले आहे. केवळ रामललालाच नाही तर देशातील ४ कोटी नागरिकांना पक्के घर मिळाले आहे. आज आम्ही प्रत्येक घरात पाणी पोहोचवतो आहे. प्रत्येक घराला पाणी मिळावे यासाठी आम्ही पाण्याच्या दोन लाख टाक्या बांधल्या आहेत.