वाहतूक पोलिसांची कारवाई : बेशिस्त वाहनचालकांना आळा घालण्याचा प्रयत्न
पिंपरी – बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दहा महिन्यांत नो-पार्किंग किंवा बेशिस्तपणे रस्त्यात वाहने उभी करणाऱ्या 92 हजार 760 वाहनांवर पोलिसांनी जॅमरची कारवाई केली आहे. शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यावर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकडे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी विशेष लक्ष देण्यास सुरवात केली. त्यानुसार हिंजवडी, भुजबळ चौक, भूमकर चौक, डांगे चौक, चाकण आणि तळेगाव आदी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. मात्र वाहन चालकांचा बेशिस्तपणा हे देखील वाहतूक कोंडीचे एक मुख्य कारण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेक वाहन चालक मनमानी पद्धतीने आपली वाहने रस्त्यात उभी करतात. यामुळे वाहतूक कोंडी होऊन इतर वाहन चालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
अशा बेशिस्त वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे आदेश माजी पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी वाहतूक पोलिसांना दिले होते. यामुळे नो-पार्किंग आणि रस्त्यात बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांवर जॅमरची कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 92 हजार 760 वाहनांवर पोलसांनी जॅमरची कारवाई केली. आता नवीन आलेल्या आयुक्तांनी देखील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
तीव्र करणार कारवाई
नवीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी देखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वांत आधी वाहतुकीची शिस्त लावण्यावरच भर दिला आहे. शनिवारपासून नो-पार्किंग भागात आणि रस्त्यात कुठेही वाहने उभी करणाऱ्यांच्या विरोधात पुन्हा एकदा जॅमरची कारवाई सुरू केली आहे. कारवाईच्या पहिल्याच दिवशी शनिवारी तब्बल 750 वाहनांवर जॅमरची कारवाई केली. त्यानंतर रविवारी 670 वाहनांवर कारवाई केल्याची नोंद वाहतूक पोलिासांच्या दप्तरी आहे. मात्र वाहतूक शाखेतील बहुतांश पोलिसांची साप्ताहिक सुट्टी शनिवारी आणि रविवारी असते. यामुळे सोमवापासून आणखी जोमाने कारवाईला वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे.
“वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे. आपल्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी. वाहतुकीच्या निमयांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात यापुढील काळात कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.”
– प्रसाद गोकुळे, वाहतूक पोलीस निरीक्षक, नियोजन विभाग