जामखेड : सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून जामखेड शहराच्या 80 कोटी 34 लाख रुपये एवढी किंमत असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता 67 कोटी 46 लाख रुपयांच्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी वारंवार पत्रव्यवहार व बैठका घेऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
जामखेड शहरातील सर्व सांडपाणी गेल्या कित्येक वर्षांपासून विंचरणा नदीत सोडण्यात येतंय. त्याचबरोबर शहरात भूमिगत गटार योजना नसल्यामुळे प्राण्यांचाही नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आता भूमिगत गटार योजना मंजूर झाल्यामुळे हे सर्व सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा वापर शेतकर्यांना शेतीसाठी देखील करता येणार आहे.
भूमिगत गटार योजना मंजूर झाल्यामुळे व नदीतील जामखेडमधील विंचरणा नदी ही कायमस्वरूपी स्वच्छ राहील तसेच नदीच्या अवतीभवती सुशोभीकरण देखील करता येणार आहे. शहराच्या सौंदर्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन झाल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याला येणारी अडचणही दूर होईल.
“जामखेड शहरासाठी महत्त्वाची असणारी पिण्याच्या पाण्याची योजना व त्याबरोबरच भूमिगत गटार योजनेसाठी भरीव निधी देऊन जामखेडमधील लोकांची अनेक वर्षांपासूनची अडचण सोडवल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब व मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त करतो.
-रोहित पवार(आमदार )
रोहित पवार हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच शासनस्तरावर त्यांनी वेळोवेळी या योजनेला मान्यता मिळावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. यासोबतच काही महिन्यांपूर्वी जामखेडला मंजूर झालेल्या 138.84 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतही 2022च्या डीएसआर किमती बदलल्याने वाढ होणार होती.
आता सदरील प्रकल्पाला आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न करून अखेर सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून आणली आहे. त्यानुसार या योजनेसाठी 12.13 कोटी रुपये अतिरिक्त मंजूर करण्यात आले आहे. आता सदरील सुधारित पाणीपुरवठा योजनेची किंमत ही 150.97 कोटी रुपये एवढी आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या कामाचा सपाटा सुरू ठेवल्याचं वेळोवेळी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नुकतीच त्यांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली.